लखनौ : वृत्त संस्था – महाराष्ट्रात आज मंगळवारपासून बारावीची परिक्षा सुरु होत असताना उत्तर प्रदेशातही आजपासून दहावी व बारावीच्या परिक्षा सुरु होत आहे. शिक्षणात अग्रेसर समजल्या जाणा-या महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेश शालांत बोर्डाने या परिक्षेतील कॉपी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. मात्र, त्याचा परिणाम उलटा झाला असून गतवर्षीपेक्षा यंदा विद्यार्थ्यांची संख्या तब्बल दोन लाखाने कमी झाली आहे. कॉपी रोखण्यासाठी केलेल्या उपायांमुळे पहिल्या दिवशी ते अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले. महाराष्ट्रात बारावीच्या परिक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षाच्या तुलनेत ३ हजार ७२१ एवढी वाढ झाली आहे.
महाराष्ट्र असो अथवा उत्तर प्रदेश कॉपीची नेहमीच चर्चा होत असते. परिक्षा बोर्ड हे नेहमी ती जबाबदारी पोलिसांवर ढकलून मोकळे होते. पण यंदा उत्तर प्रदेश परिक्षा बोर्डाने कॉपी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा वॉइस रिकॉर्डरबरोबर राऊटर आणि ब्रॉड बँडही लावण्यात आले आहेत. आज तेथे पहिल्या दिवशी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाची हिंदी चा पेपर आहे. राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर लखनौमध्ये बनविण्यात आलेल्या कंट्रोल रुममधून नजर ठेवली जाणार आहे.
याबरोबर युपी बोर्डाने प्रथमच दोन हेल्पलाइन नंबर आणि एक ट्विटर अकाऊंट सुरु केले आहे. कॉपी रोखण्यासाठी उत्तर पत्रिका ही चार रंगात तयार करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये शिलाई केलेली उत्तर प्रत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. अनेकदा शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे लखनौतील नियंत्रण कक्षातून सर्व परीक्षा केंद्रावर लाइव्ह सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे परीक्षा केंद्र, परीक्षार्थी आणि शिक्षकांवरही थेट नजर ठेवली जाणार आहे.
कॉपी रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनेमुळे परीक्षेला बसणा-यांच्या संख्येत प्रथमच मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. दहावी परीक्षेला गेल्या वर्षीपेक्षा १ लाख ६९ हजार ९८० परीक्षार्थींची संख्या कमी झाली आहे. तर बारावी मध्ये १८ हजार ६५८ ने कमी झाली आहे. कॉपी रोखण्यासाठी केलेल्या या उपाययोजनांमुळे तब्बल २ लाख विद्यार्थी परीक्षा केंद्राकडे फिरकलेच नाहीत.