लस दिलेल्या व्यक्तीपासून ‘कोरोना’चा विषाणू पसरण्याचा धोका अधिक, तज्ज्ञांचे मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेत अनेक लोक संक्रमित होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लशीमुळे ती घेणाऱ्या व्यक्तीस संरक्षण मिळते, त्या व्यक्तीस कोविड संसर्ग होऊ शकतो पण तो गंभीर पातळीवर जात नाही. मात्र त्या व्यक्तीकडून इतर व्यक्तींना संसर्गाचा धोका कायम असतो. त्यामुळे लस घेतली म्हणून कोरोनाचे नियम पाळण्याची गरज नाही, हा आत्मविश्वास जिवावार बेतू शकतो असा इशारा साथरोगतज्ज्ञांनी दिली आहे.

तज्ज्ञांच्या मतानुसार ज्या व्यक्तीला लस दिली आहे, त्या व्यक्तीपासून कोरोनाचा विषाणू पसरण्याची जोखीम अधिक आहे. लसीकरण हा साथरोगावरील उपायांमधील एक भाग आहे, असे असले तरी कोरोनावर अंतिम उत्तर अद्याप नाही, असे मत नवी दिल्लीच्या राष्ट्रीय रोगप्रतिबंध संस्थेचे डॉ. सत्यजित रथ यांनी म्हटले आहे.

पुण्यातील आयसरमधील साथरोगतज्ज्ञ विनिती बाळ यांनी सांगितले की, सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही लशीपासून या रोगाचा प्रसार थांबवता येणे शक्य नाही. लसीकरण केल्यानंतर देखील लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते. फक्त एवढेच की लस घेणाऱ्या व्यक्तीला होणारा कोरोना गंभीर स्वरुपाचा नसेल.

डॉ. सत्यजित रथ यांनी सांगितले की, एखाद्या व्यक्तीला लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला विषाणूला निष्क्रिय करणारे प्रतिपिंड तयार होतात. ते बराच काळ टिकतात. यानंतर पुन्हा संसर्ग होऊ शकतो पण तो तीव्र रुप धारण करत नाही. लशीला प्रतिकार करणारे ‘सार्स कोव्ह 2’चे काही प्रकार आहेत. यामध्ये पुन्हा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे लस दिलेल्या व्यक्तीकडून संसर्ग होण्याचा धोका टाळला जाऊ शकत नाही.

विनिती बाळ यांनी सांगितले की, सध्या उपलब्ध असलेल्या लशींमुळे कोरोनाचा प्रसार कमी होतो किंवा नाही हा प्रश्न अनेकांना पडला आहे. लशीमुळे कोरोनाचा प्रसार कमी होत नाही. त्यासाठी सामाजिक अंतर व मास्कचा वापर हाच उपाय आहे. लसीमुळे कोविड संसर्गाची तीव्रता कमी होते, पण लस घेत्याने पुन्हा संसर्ग होतच नही असे म्हणता येणार नाही. सतत रुप बदलणाऱ्या विषाणूच्या बाबतीत देखील हेच सत्य आहे. फक्त लसीकरणामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत नाही. त्यामुळे लसीकरण महत्त्वाचे आहे.