जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हाती ’सत्ता’, तोपर्यंत गरीब मराठ्यांना ना ’सत्ता’ ना ’आरक्षण’ – प्रकाश आंबेडकर
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हाती ’सत्ता’ आहे, तोपर्यंत गरीब मराठ्यांना ना ’सत्ता’ मिळणार ना ’आरक्षण’, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिलीय. यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात आघाडी सरकारविरोधात सकल मराठा समाजाने संताप व्यक्त केलाय. या वेळप्रसंगी कोरोना विषाणूचे संकट झुगारून रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील त्यांनी दिलाय. याच मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात मुलाखत देताना आपले मत मांडले आहे. यावेळी त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला असता, ’180 ते 182 आमदारांना आरक्षण नको. मी श्रीमंत मराठाविरुद्ध गरीब मराठा, असे विधानही केले होते. त्यामुळे श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे, तोपर्यंत गरीब मराठ्यांना सत्ता आणि आरक्षणही मिळणार नाही. त्यामुळे गरीब मराठ्यांनी आपली भूमिका घेणे गरजेचे आहे. आपल्या जातीबरोबर राहायचे की आरक्षणाबरोबर राहायचे? हे त्यांनी ठरवणे गरजेचे आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.
आठवडाभरात घेतील मंदिरं खुली करण्याचा निर्णय –
महाराष्ट्र राज्यातील मंदिरांमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. राज्यातील मंदिरे खुली झाली तर मोठा महसूलही राज्य सरकारला मिळू शकतो. सरकारसोबत चर्चा सुरू असून मंदिरे खुली करण्यासाठी नियमावली तयार केली जातेय. आठवडाभरात मंदिरे खुली करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
…तर गरीब मराठ्यांनी आरक्षणावर पाणी सोडावे -प्रकाश आंबेडकर
याअगोदर रविवारी, प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, महाराष्ट्रा राज्याच्या विधानसभेत 288 आमदारांपैकी 182 आमदार हे मराठा समाजाचे आहेत. हे सर्व आमदार श्रीमंत आहेत. एकमेकांशी नात्यागोत्याचे संबंध आहेत. नात्यागोत्याचे राजकारण करतात. तसेच ते इतरांना राजकारणात येऊ देत नाहीत, अशी परिस्थिती आहे.
गरीब मराठ्यांनी आरक्षण मिळावे म्हणून लढा उभा केला. तो आता न्यायालयामध्ये आहे. श्रीमंत मराठ्यांची सत्ता असतानासुद्धा गरीब मराठ्यांच्या बाजूने ते लढत नाहीत, ही परिस्थिती आहे.
माझे गरीब मराठ्यांना आवाहन आहे की, त्यांनी त्याचा लढा दिल्याशिवाय त्यांना आरक्षण मिळणार नाही. पाहू या गरीब मराठा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात लढायला उतरतो का? तो उतरला तर त्याला आरक्षण मिळेल. तो नाही उतरला, तर त्याने आरक्षणावर पाणी सोडावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले होते.