‘वंचित’सोबतची युती तोडण्याचा ‘MIM’ चा निर्णय योग्य : रामदास आठवले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात असलेली युती आज संपूष्टात आली. वंचितसोबतची युती तोडण्याचा एमआयएमचा निर्णय योग्य आहे. वंचितसोबत राहून एमआयएमला काहीही फायदा होत नव्हता. उलट वंचितला एमआयएमचा फायदा झाल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले आहे. नागपूरमध्ये आठवले यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीतील अनेक कार्यकर्ते आमच्या आरपीआयमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे सांगत एमआयएम जरी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडली असली तरी आम्ही मात्र महायुतीतून बाहर पडणार नसल्याचे आठवले यांनी सांगितले. एमआयएमचा एकमेव खासदार त्यांच्या चिन्हावर निवडून आला आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कोणतेही योगदान नसल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता होईल असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले असले तरी, वंचित बहुजन आघाडीला विधानसभेत फारशी मतं मिळणार नाहीत. विरोधी पक्षनेता बनेल एवढी मतं वंचितला मिळणार नसल्याचे मत रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.