सरकारकडे अर्थव्यवस्था बदलासंदर्भात कोणतीही योजना नाही : प्रकाश आंबेडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे अर्थव्यवस्थेची गती अधिकच मंदावलेली आहे. त्यातच केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था कशी बदलली पाहिजे याबद्दल कोणतीही योजना नाही. जर अर्थव्यवस्थेसंबंधी योजना असती तर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करु शकलो असतो.त्यामुळे कोरोनानंतर फार मोठा बदल होईल असं मला वाटत नाही असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी प्रकाश आंबेडकर आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे दरवर्षी होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अनुयायांना घऱातूनच अभिवादन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, १ जानेवारी या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस असल्याचं आम्ही मानतो. केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्थेसंबंधी योजना असती तर कदाचित कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करु शकलो असतो. लोकं काय निर्णय घेतला पाहिजे सांगत आहेत. तर शासन काय निर्णय घ्यायचा हे ठरवत नाहीये. दुर्दैवाने सरकार फक्त आदेश काढत आहेत. मुंबई किंवा पुण्यातील लोकल आतापर्यंत सुरु व्हायला हवी होती. सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही असं दिसत आहे, करोनानंतर फार मोठा बदल होईल असं मला वाटत नाही,असंही त्यांनी यावेळी सांगितलं.