प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका, म्हणाले – …म्हणून मृत्यूपुर्वी स्टेडियमला पंतप्रधानांचे नाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. मात्र, यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावंन ओळखलं जाणाऱ्या या स्टेडियमला भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं. यावरून अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरवर बोचरी टीका केली आहे. या देशाला काय नेता मिळाला आहे. यांना लोक विसरून जातील याची चिंता आहे. लोकांवर यांना भरवसा नाही की मृत्यूनंतर यांची आठवण कोणी ठेवेल की नाही. यासाठीच मृत्यूपूर्वी स्टेडियम आपल्या नावे करून घेतलं, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली.

हे शक्ती, आकांक्षेचे प्रतिनिधित्व
स्टेडियमच्या उद्धघाटनप्रसंगी बोलताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्टेडियमची संकल्पना राबविली होती. त्यावेळी ते गुजरात क्रिकेट संघटनेचे अध्यक्षही होते. पर्यावरणाचा विकास म्हणून हे स्टेडियम योग्य उदाहरण आहे. भारताच्या शक्ती आणि महत्त्वाकांक्षेचं प्रतिनिधित्व हे स्टेडियम करतं.
क्रिकेट जगतात भारताचे महत्त्वपूर्ण स्थान आहे, त्यासाठी जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम भारतातच असायला हवं. या स्टेडियमच्या निमित्ताने भक्कम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करत अहमदाबादची जगामध्ये वेगळी ओळख निर्माण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘…म्हणून स्टेडियमला मोदींचे नाव’
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, नरेंद्र मोदी यांचं हे स्टेडियम स्वप्न होतं. आम्ही पंतप्रधानांचं नाव या स्टेडियमला देण्याचं निश्चित केलं. भविष्यात राष्ट्रकुल क्रीडा, आशियाई क्रीडा आणि ऑलिम्पिक स्पर्धांचेही आयोजन या भव्य परिसरात करता येऊ शकेल. हे संपूर्ण क्रीडा संकुल पुढील सहा महिन्यात तयार होईल. छोट्या शहरामधून आमचे अनेक खेळाडू मोठा संघर्ष करीत येतात. त्यांना जीसीएनं प्रोत्साहन दिलं आहे. असेही ते म्हणाले.