राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेसैनिक झाले आक्रमक, महावितरणचं कार्यालय फोडलं

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील जनतेला आलेल्या वाढीव बिलावरून वीज वीतरण कंपन्या आणि राज्य सरकारने काहीच ठोस निर्णय न घेतल्याने मनसे सैनिक संतापले आहेत. आज मनसे सैनिकांनी नवी मुंबईतील महावितरणच्या कार्यालयासमोर आधी वाढीव बिलाची दहीहंडी फोडली. त्यानंतर महावितरणचं कार्यालय फोडून राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

नवी मुंबईत आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. वाशी सेक्टर 17 मधील महावितरणच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. कार्यालयाच्या काचा आणि फर्निचरची कार्यकर्त्यांनी तोडफोड करुन वीज बिल दरवाढीचा निषेध केला आहे. काही दिवसांपूर्वी वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं होतं. त्यानंतर आज मनसे स्टाईल आंदोलन करण्यात आले.

वीज प्रश्नावर राज्य सरकारचं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी लिहीलेल्या पत्रातून केला होता. भरमसाठ वीज बिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावर प्रहारच आहे, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं होते. वीज बिलांच्या मुद्यावर मनसे गप्प राहील अशी चुकीची समजूत सरकारने करून घेऊ नये, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता.

दरम्यान, सोमवारी नागपूरमधील एका व्यक्तीने वीज बिल जास्त आल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लीलाधर गायधरणे यांना एकत्रित तब्बल 40 हजार रुपयांचे वीज बिल आले होते. अचानक एवढ्या मोठ्या रक्कमेचं वीज बील आल्याने गायधणे अस्वस्थ झाले होते. त्यांनी बिल कमी करावे या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयात तक्रार केली होती. पण अनेकदा प्रयत्न करुनही वीज बिल कमी झालं नाही.