नगर : 10 % आरक्षणासाठी वंजारी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

नेवासा (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाईन – नेवासा तालुक्यातील वंजारी समाज बांधवांच्यावतीने विविध मागण्यांसाठी “एकच मिशन वंजारी आरक्षण”चा नारा देत आज नेवासा तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. वंजारी समाजाचे नेते रामदास गोल्हार, नेवासा तालुका वंजारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष भिवाजी आघाव, उद्धव आव्हाड, डॉ.रामनाथ बडे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. एक वाजता सदरचा मोर्चा तहसील कचेरीवर आला. वंजारी समाजाच्या मागण्यांची दखल न घेतल्यास समाज सरकारला आपली ताकद दाखवून देईल, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.

नेवासा येथील विखोना पेट्रोल पंपापासून दुपारी मोर्चास प्रारंभ झाला. ‘स्वर्गीय मुंडे साहेबांचा विजय असो, वंजारी समाजाला हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे’, अशा घोषणा मोर्चेकऱ्यांनी यावेळी मोर्चाप्रसंगी बोलतांना दिल्या. भगवे झेंडे हातात घेऊन ..जय भगवान.., भगवान बाबा की जय, एकच मिशन वंजारी आरक्षण असा नारा ही यावेळी देण्यात आल्या. वंजारी समाजाला २ टक्के वरून १० टक्के आरक्षण मिळावे, जाती निहाय जनगणना करावी, स्वर्गीय गोपीनाथजी मुंढे महामंडळ स्थापन करावे, नोकर भरतीतील अन्याय दूर करावा, सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी बिन व्याजी कर्ज मिळावे, वंजारी समाजासाठी जिल्हानिहाय वसतिगृह चालू करावे अशा मागण्या मोर्चात मांडण्यात आल्या.

उद्धव आव्हाड यांनी प्रास्ताविक केले तर उपस्थित वंजारी समाज बांधवांचे भिवाजीराव आघाव यांनी स्वागत केले. यावेळी सुभाष राख भिवाजी आघाव, रामदास गोल्हार, बाळासाहेब सानप, रुपाली डोंगरे, दीपाली डोंगरे यांच्या हस्ते तहसीलदार रुपेश सुराणा यांना निवेदन देण्यात आले. याबाबत त्वरित अहवाल प्रशासनाला पाठवून आपल्या भावना शासनाला कळविल्या जाईल, असे आश्वासन त्यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.

यावेळी जय भगवान महासंघाचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब सानप, समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक रामदास गोल्हार, नेवासा तालुका वंजारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष भिवाजीराव आघाव, उपाध्यक्ष सुभाष राख, डॉ.रामनाथ बडे, उद्धव आव्हाड, सुधाकरराव आव्हाड, डॉ.सचिन सांगळे, राजेंद्र सानप, हरिभक्त परायण विष्णू महाराज सांगळे, डॉ.सचिन सांगळे, बाबासाहेब गोल्हार, अँड.किशोर सांगळे, माजी स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर अशोक चौधरी, अँड.शिवाजी शिरसाठ, यममाजी आघाव, निवृत्ती ढाकणे, मेजर महादेव आव्हाड, रघुनाथ गर्जे, संजय पालवे, महादेव दराडे, साहेबराव इलग, अंबादास दराडे, रघुनाथ गर्जे, सचिन कराड यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.