Veer Savarkar : गौरवाचा प्रस्ताव फेटाळला अन् शिवसेनेनं भाजपाचा ‘डाव’च उलटवला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना आज सत्ताधारी आणि विरोधक स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या पुण्यतिथीवरुन आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. भाजपकडून मागणी होत आहे की वीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव सभागृहात मांडण्यात यावा. परंतु हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने नाराज भाजप आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि सरकराच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, वीर सावरकरांच्याबद्दल काँग्रेसच्या मासिकात अपमानास्पद शब्द वापरण्यात आला, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी या शिदोरी मासिकावर बंदी आणवी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभेत गौरव प्रस्ताव आणावा अशी मागणी करण्यात आली. या प्रस्तावावरुन भाजपने शिवसेना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न देखील केला, तर शिवसेनेने भाजपच्या डाव त्यांच्यावर उलटवून लावाला. भाजपने ज्या प्रस्तावाची मागणी केली आहे, त्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या आणि मग अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो, यावर नितेश राणे यांचे मत घ्या, त्यांना प्रस्ताव मांडायला सांगा असा टोला संसदीय कामकाज मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी लगावला.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्य सरकारने यापूर्वीच केंद्राकडे पत्र लिहून स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली आहे परंतु अद्याप केंद्राकडून अद्याप ही मागणी पूर्ण झाली नाही. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे विरोधकांनी पंतप्रधान मोदींकडे यासाठी प्रयत्न करावेत, आम्हीही प्रयत्न करतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायला हवा अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान वारंवार भाषणातून फडणवीस काँग्रेसच्या मासिकात जो उल्लेख आहे तो मजकूर वाचवून दाखवत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करताय असा चिमटा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते फडणवीसांना लगावला.

संपूर्ण राज्यात भाजपकडून वीर सावरकरांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. परंतु शिवसेनेचे सावरकर प्रेम किती खरे आहे ते आज कळेल. भाजपने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने मागणी केली आहे की वीर सावरकरांच्या अभिमानाचा प्रस्ताव आणावा. परंतु भाजप सत्तेत असताना सावरकर यांच्याबद्दल प्रस्ताव का आणला नाही असे विचारल्यावर आमच्या काळात सावकरांचा अपमान करण्याची कोणाची हिंमत नव्हती, त्यामुळे तेव्हा ती गरज पडली नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र शिवसेना सावरकरांवर प्रेम करते की फक्त सन्मानाच्या नावाखाली ढोंग करते ते जनतेसमोर येईल असा टोला भाजपकडून लावण्यात आला.