सोनिया गांधी आम्हाला मातेसमान, पण…

बंगळुरु : वृत्तसंस्था – काँग्रेसला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष देण्याची मागणी करणारे पत्र पक्षातील 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांनी लिहले होते. या पत्रामुळे पक्षामध्ये मोठे वादंग उठले. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत याचे पडसाद उमटल्याचे दिसून आले. या प्रकरणाला आता वेगवेगळे वळन येताना पहायला मिळत आहेत. दरम्यान, सोनिया गांधींना पत्र लिहणाऱ्या 23 नेत्यांपैकी एक असलेल्या वीरप्पा मोईली यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे.

सोनिया गांधी काँग्रेस पक्षासाठी मातेसमान आहेत. मात्र, पक्षामध्ये नवी ऊर्जा फुंकण्यासाठी बदलांची गरज आहे, असे विरप्पा मोईली यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना मोईली यांनी हे विधान केले आहे. दरम्यान, हे पत्र माध्यमांकडे लीक झाल्याबद्दल मोईली यांनी खेद व्यक्त केला आहे. तसेच यासाठी जबाबदार लोकांचा शोध घेण्यासाठी अंतर्गत तपास होऊन त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असेही मोईली यांनी म्हटले आहे.

मोईली म्हणाले, पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांच्या मनात पक्ष सोडून जाण्याचा कोणताही विचार नाही. आम्ही सोनिया गांधींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलेला नाही. दरम्यान, सोमवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी आणि राहुल गांधी यांचे हात बळकट करण्याचा प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.