काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन सतीश शर्मा यांचं निधन

पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा (वय ७३) यांचं निधन झालं आहे. गोव्यात त्यांनी अखेऱचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांना कॅन्सर झाला होता त्याचबरोबर ते आजारीही होते. दरम्यान, कॅप्टन सतीश शर्मा यांनी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. ते तीन वेळा लोकसभा खासदार राहिले होते.

पी व्ही नरसिम्हा राव यांच्या सरकारमध्ये राजीव गांधींचे निकटवर्तीय असणारे कॅप्टन सतीश शर्मा यांच्याकडे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय देण्यात आलं होतं.

आंध्रप्रदेशमधील सिकंदराबादमध्ये ११ ऑक्टोबर १९४७ रोजी कॅप्टन सतीश शर्मा यांचा जन्म झाला होता. शर्मा हे व्यावसायिक वैमानिक होते. राजीव गांधींमुळे ते राजकारणात आले. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१ मध्ये शर्मा अमेठीमधून निवडून आले होते. १९९८ ते २००४ दरम्यान शर्मा रायबरेलीमधून खासदार होते. नंतर सोनिया गांधींसाठी त्यांनी ती जागा रिक्त केली. यानंतर २००४ ते २०१६ दरम्यान राज्यसभा खासदार म्हणून त्यांनी मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचं नेतृत्व केलं. काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.