संपूर्ण देशात AIMIM चा झेंडा फडकावणार, अकबरुद्दीन ओवैसी यांचे विधान

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – बिहार विधानसभा निवडणुकीत (bihar-election) 5 जागावर विजय मिळवल्यानंतर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) संघटनेचा आत्मविश्वास वाढला आहे. असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू आणि एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi )यांनी संपूर्ण हिंदुस्तानात AIMIM चा झेंडा फडकणार असल्याचे म्हटले आहे. बिहारमध्ये एआयएमआयएमच्या विजयानंतर हिंदुस्तानच्या राजकारणात नवी तारीख लिहिली जाईल असे म्हटले आहे.

बिहार विधानसभेचा निकाल आल्यानंतर एआयएमआयएमचे सगळे आमदार पाटण्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, पक्षाकडून आपल्या पाचही आमदारांना हैदराबादला आमंत्रित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओवैसींना पक्षातील आमदार फुटण्याची भीती असल्याने आपल्या आमदारांना हैदराबादला बोलावले आहेत.

मित्र आणि शत्रुंना ओळखा
अकबरुद्दीन ओवैसी यांनी बिहारमधील त्या पाच आमदारांची भेट घेतली आहे. मित्र आणि शत्रुंना ओळखा, आपल्या आणि परक्यांमध्ये फरक ओळखायला शिका, परिस्थिती ओरडून सांगतेय की एक व्हा असे अकबरुद्दीन ओवैसी यांनी हैदराबादमधील एका कार्यक्रमात म्हटले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळाले आहे. यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत.

भाजप एनडीएतील सर्वात मोठा पक्ष
भाजपने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 74 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने पहिल्यांदाच जेडीयूपेक्षा जास्त जिंकल्या आहेत. त्यामुळे आता भाजप युतीमधील मोठा भाऊ ठरला आहे. जेडीयूला विधानसभा निवडणुकीत 43 जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही सरकारचे नेतृत्त्व नितीश कुमारच करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेतृत्त्वाने स्पष्ट केले आहे.