तिरंग्याला ‘साक्ष’ मानून ‘शपथ’ घेतो की, मी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तासंघर्षाच्या महानाट्याला पूर्णविराम मिळाल्यानंतर 14 व्या विधानसभेच्या कामकाजाला आजपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विधानसभेचे विशेष अधिवेश बोलविण्याचे आदेश दिल्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून सभागृहात नवनिर्वाचित आमदारांच्या शपथ विधीला सुरुवात झाली. 14 व्या विधानसभेत काही नवखे चेहरे आहेत तर काही जुने चेहरे आहे. ज्यावेळी त्यांना आमदारकीची शपथ देण्यात आली त्यावेळी काही तरुण आमदार भाऊक झाल्याचे पहायला मिळाले. रोहीत पवारांच्या शपथविधीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यांच्याप्रमाणेच अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनीही हटके शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्या शपथविधीचे सर्वत्र, सोशल मीडियातून कौतुक होत आहे.

विधानसेत येणाऱ्या प्रत्येक आमदाराचे खासदार सुप्रिया सुळे यांनी हस्तांदोलन करून स्वागत केले. प्रथमच आमदार झालेल्या तरुणांना गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले. तर रोहीत पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या पायापडून विधानसभेत प्रवेश केला. 14 व्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी निवडून आलेल्या 288 पैकी 285 आमदारांना दुपारी एकपर्यंत शपथ दिली. यावेळी भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि स्वाभिमानी संघटनेचे देवेंद्र भुयार हे अनुपस्थित असल्याने त्यांचा आज शपथविधी होऊ शकला नाही. तर कालिदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून कालच शपथ घेतली होती.

यंदाच्या 14 व्या विधानसभेत अनेक नवयुवक आमदार म्हणून पोहचले आहेत. यामध्ये रोहित पवार, संदीप क्षीरसागर, आदित्य ठाकरे हे आहेत. या तिघांनीही आपले वेगळेपण आज विधानभवनात सिद्ध केले. रोहित यांनी शपथ घेतेवेळी आईचे नाव घेतले, तर आदित्य ठाकरे यांनी शपथविधीनंतर माजी मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन हातमिळवला. अचलपूर मतदारसंघातून चार वेळा अपक्ष म्हणून निवडून येणारे आमदार आणि प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी आमदारकीची शपथ घेताना, मी ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू तिरंग्याला सक्ष मानून शपथ घेतो की, असे म्हणत आपला शपथविधी पूर्ण केला. आज शपथ घेणाऱ्या आमदारांपैकी बच्चू कडू हे एकमेव आमदार आहेत त्यांनी तिरंग्याला साक्ष मानू शपथ घेतली.

Visit : Policenama.com