‘सुजय विखे आणि पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय ? नेत्यांची मुलं म्हणून त्यांना उमेदवारी देणार का ?
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. सुजय विखे आणि पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय असे वक्तव्य जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे. शिवाय पार्थ आणि सुजय हे केवळ नेत्यांची मुलं आहेत म्हणून त्यांना पक्षात घेत त्यांना उमेदवारी देणार का ? असा सवालही विजय शिवतारे यांनी केला आहे. इतकेच नाही तर, शरद पवार यांना वाऱ्याची दिशा समजल्याने त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे अशी टीकाही त्यांनी केली. पुण्यातील वैशाली हॉटेल येथील कट्ट्यावर विजय शिवतारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
यावेळी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, “पार्थ पवार आणि सुजय विखे या दोघांचे कर्तृत्व काय आहे ? केवळ नेत्यांची मुलं म्हणून त्यांना पक्षात घेत उमेदवारी देणार का ? दोघांनी किमान दहा वर्ष तरी समाजासाठी काम करण्याची आवश्यकता होती. त्यानंतरच पक्षांनी त्यांच्या उमेदवारीचा विचार करायला हवा होता ” असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. सध्या मावळमधून पार्थ पवार आणि नगर येथून सुजय विखे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु आहे. याच मुद्द्यावर विजय शिवतारे यांनी भाष्य केलं आहे.