सरकारी कर्मचार्‍यांसाठी वाईट बातमी ! महत्वाचे विभाग सोडून इतरांच्या पगारात कपात होण्याची शक्यता, ‘या’ मंत्र्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   पुढील महिन्यात पगार देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढण्याची वेळ पडेल अशी परिस्थिती आहे. मात्र, जे कोरोनासाठी काम करत आहेत त्यांचा पगार व्यवस्थित होईल. परंतु इतरांबाबतीत थोडसं मागे पुढे होऊ शकतं. चार महत्त्वाचे विभाग वगळता इतर विभागामध्ये काटछाट करण्याची वेळ येऊ शकते, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ते पुण्यात बोलत असताना ही माहिती दिली.

विजय वडेट्टीवार म्हणाले, सारथी संस्था सुरु राहील. यावर्षी देखील सारथी संस्थेला पन्नास कोटी रुपयांची तदतूद करण्यात आली आहे. मात्र सारथी बद्दल काहीजण गैरसमज पसरवून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे राजकारण कोण करत आहे यासंदर्भात मी आता बोलणार नाही, असे ते म्हणाले. सारथीच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रशिक्षण देण्यापुरती सारथी मर्यादित राहणार नाही. सारथीला साधारणपणे 38 कोटी रुपये द्यावे लागणार असून याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

सारथीला आम्ही आर्थिक मदत नक्की करणार आहोत. मात्र त्यामध्ये थोडं पुढं मागं होऊ शकतं. कारण आधी कोरोनासाठी काम करणाऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती गंभीर आहे आणि ती पुढच्या डिसेंबरपर्यंत चालेल असं तज्ज्ञ सांगतात, असंही ते म्हणाले. पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकारकडून कोणतीही मदत झालेली नाही. पीएम केअरला फंडाला मदत करा अस सांगणारे महाराष्ट्र द्रोही आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे अजुनही सत्ता गेल्याच्या शॉकमधून बाहेर आलेले नाहीत, असे ते म्हणाले.