आधी बाळासाहेबांचे स्मारक उभारा, मग अयोध्येकडे लक्ष द्या : विहिंप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर आता शिवसेनेच्या अयोध्या मोहिमेवर विश्व हिंदू परिषदेनेही टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारावे आणि मग अयोध्येकडे लक्ष द्यावे, अशी टीका विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्या. विष्णू कोकजे यांनी केली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या रुग्णसेवा सदनच्या वर्धापनदिन समारंभात कोकजे बोलत होते. उद्धव ठाकरे हे अयोध्येत २५ नोव्हेंबरला शक्तीप्रदर्शन करणार आहेत. विहिंपने केलेल्या या टीकेवर शिवसेना कोणते उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.

कोकजे म्हणाले, महाराष्ट्रात परप्रांतीयांच्या मुद्दय़ावरून ते उत्तरभारतीयांना झोडतात. त्यामुळे उत्तरप्रदेशात जाऊन उद्धव ठाकरे कोणते आवाहन करणार आहेत. शिवसेनेला इतक्या वर्षांनी राम मंदिराचा मुद्दा कसा आठवला? त्यांची तेथे ताकद किती आहे. अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने कायदा करावा. न्यायालयाच्या निकालाची किती काळ प्रतीक्षा करणार? त्याऐवजी अध्यादेश जारी करावा. शबरीमला मंदिरामध्ये महिलांच्या प्रवेशाच्या मुद्दय़ावरून सुरू असलेल्या वादाबाबत कोकजे म्हणाले, ज्या महिला पत्रकार व कार्यकर्त्यां तेथे जात आहेत, त्यांना इतके दिवस हे मंदिर कुठे होते, ते माहीतही नव्हते.

दरम्यान, इतके दिवस शांत बसलेल्या भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांना आताच कशी जाग आली. अयोध्येत जाण्यासाठी २५ तारखेचाच मुहूर्त त्यांना कसा मिळाला?, असा सवाल शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केला आहे. शिवसेनेने म्हटले आहे की, २५ वर्षांपूर्वी बाबरी मशीदीचा कलंक कायमचा पुसण्यासठी शेवटी शिवसेनेनेलाच हिंदुत्वाची वज्रमुठ आवळावी लागली. अद्यापपर्यंत राम मंदिराचे विस्मरण झालेल्या भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम मंदिराच्या उभारण्यासाठी अयोध्येत ‘हुंकार रॅलीसाठी २५ नोव्हेंबर तारीख निश्चित केली आहे. हिंदुत्वाचा एल्गार शिवसेनाप्रमुखांनी पेटवला होता. त्यामुळे आजचा हुंकार हा बाळासाहेबांच्या एल्गाराचाच भाग आहे.