शरद पवारांनी केलेलं ‘ते’ वक्तव्य हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारं, विश्व हिंदू परिषदेची टीका

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखनऊमध्ये केलेलं वक्तव्य हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारे असल्याची टीका विहिंपने आज पिंपरी मध्ये केली. विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेत ही टीका केली आहे. शरद पवार यांनी केलेले वक्तव्य हे जनतेची दिशाभूल करणारं असून यामुळे समाजात अशांती पसरेल. राम जन्मभूमी निर्माण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आदेश दिले होते असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

लखनऊमध्ये शरद पवार यांनी मुस्लीम नागरिकांकरीता ट्रस्ट का नाही बनवली असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य दिशाभूल करणारे आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे समाजात अशांती पसरेल. सुप्रीम कोर्टाने सरकारला राम जन्मभूमी निर्माणासाठी ट्रस्ट किंवा व्यवस्था बनविण्याचा आदेश दिला आहे. मुस्लीमांकरिता ट्रस्ट बनवली पाहिजे असा कोणताही विषय सुप्रीम कोर्टाने सांगितला नसल्याचे परांडे यांनी सांगितले. त्यामुळे नसलेले विषय उकरुन काढणे किंवा निर्माण करणे ज्याच्यामुळे हिंदू आणि मुस्लीम तेढ निर्माण होईल हाच हेतू यामागे दिसत असल्याचे परांडे यांनी म्हटले आहे.

परांडे यांनी सीएएवर बोलताना म्हणाले, विश्व हिंदू परिषदेचं सीएएला पूर्ण समर्थन आहे. एक मोठी ऐतिहासिक चूक दूर करण्यासाठी सीएए आणलेला आहे. याविरोधात अनेक राजकीय पक्ष विरोधी भूमिका घेत आहेत हे चुकीचे आहे. हा कायदा कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेणारा नाही तर नागरिकत्व देणारा असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हजारो संत देशभर फिरून सीएए किती उपयोगी आहे हे समजावून सांगतील असेही त्यांनी यावळी म्हटलं.