‘हे’ आहेत एप्रिल महिन्यातील मुख्य सण-उत्सव, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन :  भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे शालिवाहन शके १९४२ सुरु झाले असून, मराठी नववर्षाला आरंभ झाला आहे. तर यंदाचे संवत्सरनाम शार्वरी आहे. मार्च महिन्यात होळी, गुढीपाडवा यांसारखे मोठे सण साजरे करण्यात आले. तसेच हिंदू नववर्षाला सुरुवात झाली असून, एप्रिल महिन्यातही अनेक महत्वाचे सण साजरे केले जाणार आहे. त्याची सुरुवात मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श राजा श्रीरामांचा जन्मदिवसापासून म्हणजेच श्रीराम नवमीपासून होणार आहे.एप्रिल महिन्यातील सण-उत्सवांवर नजर टाकल्यास संपूर्ण महिना भगवंतच्या भक्ती-उपासनेत जाणार आहे.तर उत्सवाचा समाप्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीला होणार आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात सण-उत्सवांची रेलचेल असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया एप्रिल महिन्यात येणाऱ्या सण-उत्सवांविषयी…

श्रीराम नवमी (२ एप्रिल)

चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमीला रामांचा जन्म झाला. श्रीविष्णूंचा सातवा अवतार, मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श राजा अशी अनेक विशेष नामे सार्थ ठरवणाऱ्या श्रीरामांचा जन्मदिवस श्रीराम नवमी म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र ह्यावर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेता घरच्या घरी राम नवमी साजरी करणे हितकारक ठरेल. या दिवशी रामांचे पूजन, नामस्मरण करून हा दिवस साजरा केला जाऊ शकतो. याच दिवशी चैत्र नवरात्र समाप्त होत असून, स्वामीनारायण यांची जयंतीही साजरी केली जाणार आहे. तसेच या दिवशी समर्थ रामदास स्वामी यांचीही जयंती आहे.

कामदा एकादशी (४ एप्रिल)

चैत्र शुद्ध एकादशीला कामदा एकादशी साजरी केली जाते. या एकादशी दिवशी भगवान नारायण यांचे पूर्जन केले जाते. भगवान नारायण यांच्या उपासनेमुळे सर्व पापातून मुक्ती मिळते.तसेच भगवान नारायण यांचे कामदा एकादशीचे व्रत केल्यामुळे ब्रम्ह हत्यासारख्या महाभयंकर पापातूनही मुक्ती मिळते अशी आख्यायिका आहे.

भगवान महावीर जयंती (६ एप्रिल)

चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. या दिवशी अनंग त्रयोदशी असून, अनंग व्रत केले जाते. संस्कृत संस्कृत साहित्यात कामदेवाला अनंग म्हटले आहे. समाधी भंग केल्यामुळे महादेव शिवशंकराने कामदेवाला भस्म केले. यानंतर कोणत्याही अंगाशिवाय त्यांनी सर्व प्राण्यांमध्ये प्रवेश केला, असे म्हटले जाते. म्हणून चैत्र शुद्ध त्रयोदशीला अनंग त्रयोदशी म्हटले जाते आणि या दिवशी अनंग व्रत केले जाते.

हनुमान जयंती (८ एप्रिल)

चैत्र पौर्णिमेला रामभक्त हनुमान यांचा जन्म झाला होता. बुद्धिमतांवरिष्ठम्, मनाच्या वेगाने कुठेही पोहोचू शकणारे, परम रामभक्त आणि चिरंजीव अशा हनुमंतांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. बळ आणि बुद्धिचा अनोखा संगम हनुमंतांच्या ठायी पाहायला मिळतो. चैत्र पौर्णिमेला वैशाख स्नानारंभ होत आहे.

गुड फ्रायडे (१० एप्रिल)

ख्रिश्चन धर्मीयांमध्ये गुड फ्रायडे या दिवसाला महत्व असून, येशू ख्रिस्ताला या दिवशी क्रॉसवर चढवले गेले होते. गुड फ्रायडेला होली फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे, असेही म्हटले जाते. गुड फ्रायडे सप्ताहाच्या स्वरुपात साजरा केला जातो. यानांतर ईस्टर संडे साजरा केला जातो. मात्र कोरोनाचा वाढत प्रभाव बगता गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे घरीच राहून साजरा करणे काळाची गरज आहे. येशू ख्रिस्ताचे स्मरण घरच्या घरी राहून करणे सर्वांसाठी हितकारक ठरणार आहे.

संकष्ट चतुर्थी (११ एप्रिल)

शनिवारी ११ एप्रिल रोजी संकष्ट चतुर्थी असल्याने या दिवशी गणेश भक्त संपूर्ण दिवस उपवास करून गणपतीचे नामस्मरण करून संकष्ट चतुर्थी व्रत करतात. गणोती उपासकांसाठी संकष्ट चतुर्थीला महत्व आहे. चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते आणि सर्वानी शिकून साक्षर होणायचा आग्रह धरणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल)

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती आहे. हा दिवस समानता दिवस आणि ज्ञान दिवस म्हणूनही साजरा केला जातो. महान मानवाधिकार आंदोलक, भारतीय संविधान निर्माण करण्यात सिंहाचा वाट असणारे, दलितांचे कैवारी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रथम पुण्यात साजरी करण्यात आली. तेव्हापासून जयंती साजरी करण्याची परंपरा सुरु झाली.

वरुथिनी एकादशी (१८ एप्रिल)

१८ एप्रिल रोजी असणाऱ्या चैत्र कृष्ण एकादशीला वरुथिनी एकादशीच्या नावाने ओळखले जाते. एकादशीला उपवास करण्याची दीर्घ परंपरा आहे. या एकादशीला केलेलं व्रत मोक्षदायक मानले जात असून, यमराज आणि यमलोकाच्या भयापासून मुक्त होण्यासाठी आवश्यक असल्याचे श्रीकृष्णाने सांगतिले होते. या दिवशी श्रीविष्णूच्या वराह अवताराचे पूजन केले जाते. तसेच या दिवशी वल्लभाचार्य जयंती आहे.

परशुराम जयंती, अक्षय तृतीया (२६ एप्रिल)

वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीय आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेला अनन्य साधारण महत्व आहे. या दिवशी श्रीविष्णूचा सेवा अवतार मानला जाणाऱ्या परशुरामाची जयंती आहे. याशिवाय नर-नारायण आणि हयग्रीव आदी अवतार याच दिवशी घेण्यात आल्याची नोंद पुराणात सापडते.अक्षय तृतीयेला विष्णू देव आणि लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. या दिवशी करण्यात आलेले सत्कर्म आणि आचरण अक्षय असते,असे मानले जाते.

आद्य शंकराचार्य जयंती (२८ एप्रिल)

वैशाख शुद्ध पंचमीला आद्य शंकराचार्यांनी जयंती आहे. अनेक वर्षानंतर पुत्रप्राप्ती झाल्यामुळे शंकराचार्यांना मातेने त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण देऊन जगद्गुरू बनण्याचा त्यांचा मार्ग प्रशस्त केला. वयाच्या दुसऱ्या वर्षी वेद, उपनिषदांचे ज्ञान घेत अवघ्या ७ व्या वर्षी संन्यास घेतला,असे आद्य शंकराचार्याच्या बाबतीत सांगितले जाते. शंकराचार्यांचा जन्म केरळमधील कातडी गावात झाला होता. भारत अनेक महात्मा आणि महानसंत होऊन गेले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती (३० एप्रिल)

वैशाख शुद्ध सप्तमीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आहे. वैशाख शुद्ध सप्तमीला गंगा सप्तमी म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी गंगा पूजन केले जाते. वैशाख शुद्ध सप्तमीला भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली होती. या दिवशी केलेलं गंगा स्नान अत्यंत पवित्र मानले जाते.तसेच वैशाख शुद्ध सप्तमीला ब्रह्मदेवाच्या अंशापासून चित्रगुप्त प्रकट झाले होते. म्हणून या दिवशी चित्रगुप्त जयंती साजरी केली जाते.