शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घराचं बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने भिंत अंगावर कोसळून दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत 5 वर्षाच्या दोन मुलींचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर इथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. बेलापूर गावातील बोंबले वस्तीवर ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
वस्तीवर राहणारे बाळासाहेब गांगुर्डे यांच्या घराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पाच वर्षाची ऋतूजा बाळासाहेब गांगुर्डे आणि श्रृतीका बाळासाहेब गांगुर्डे या दोघी सायंकाळी सहाच्या सुमारास खेळत होत्या. त्याचवेळी डबर खाली करण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टरचा धक्का घराच्या भिंतीला लागल्याने भिंत दोघींच्या अंगावर कोसळली भिंतीच्या खाली दबल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघींना भिंतीच्या ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्या श्रृतीका आणि ऋतूजा यांना तातडीने श्रीरामपूर मधील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे बेलापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली.