War and Peace : आत्महत्या केलेल्या डॉ. शीतल आमटेंचं शेवटचं ट्विट काय होतं, जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन टीम – आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शीतल आमटे- करजगी यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, त्यांना वर्धा उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं होतं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. शीतल आमटे- करजगी काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.
डॉ. शीतल आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. शीतल आमटे- करजगी यांनी आज सकाळी पावणेसहाच्या सुमारास एक ट्विट केलं होतं. वॉर अँड पीस या शीर्षकाखाली शीतल यांनी एका एॅक्रेलिक पेंटिंगचा फोटो ट्विट केला होता. या एॅक्रेलिक पेंटिंगखाली त्यांचे स्वतःचे नाव आणि कालची तारिख आहे. शीतल यांच्या निधनाचे वृत्त येताच त्यांचं शेवटचं ट्विट चर्चेत आलं आहे अनेकांनी यांचे ट्विट खाली श्रद्धांजली वाहिली आहे. खूप जणांनी त्यांचे ट्विट लाईक आणि रिट्विट केलं आहे. त्यांनी हे ट्विट आणि पेंटिंगचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. शीतल यांच्या आत्महत्येने अनेकांना धक्का बसला आहे.
'War and Peace'#acrylic on canvas.
30 inches x 30 inches. pic.twitter.com/yxfFhuv89z— Dr. Sheetal Amte-Karajgi (@AmteSheetal) November 30, 2020
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातू शीतल यांचे गंभीर आरोप
डॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक’च्या माध्यमातून आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासातच हे फेसबुक लाईव्ह डिलीट करण्यात आलं होतं. डॉ. शीतल आमटे यांच्या फेसबुक लाईव्ह नंतर चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आमटे कुटुंबाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.
आमटे कुटुंबांचे निवेदनातून स्पष्टीकरण
संपूर्ण आमटे कुटुंब बाबा आमटे यांच्या कार्याशी मागील तीन पिढ्यांपासून समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल आमटे करजगी यांनी आमच्या कार्यात योगदान दिलं आहे. तथापि त्या सध्या मानसिक ताण, नैराश्यचा सामना करत आहेत. त्यांनी तिकडेच समाजमाध्यमांवर तशी स्पष्ट कबुली दिली आहे. त्यांच्या निवेदनामुळे कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून सादर सतत करीत आहे. असं त्या निवेदनातून स्पष्ट केलं होतं.