‘आगामी 4 वर्ष कशी जातील हे भाजपला समजणारही नाही’, जयंत पाटलांचा टोला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. हे वर्ष कसं गेलं. हे भाजपलासुद्धा कळलं नाही. आता सरकारची पुढची चार वर्ष कशी जातील, हे सुद्धा भाजपला कळणार नाही,’ असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही. तसंच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबद्दल विश्वास व्यक्त करताना त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. (Jayant Patil taunts BJP)

मंत्री जयंत पाटील हे आज नगरला आले होते. यावेळी ते म्हणाले, ‘मागील वर्षी २७ नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली, त्याला लवकरच एक वर्ष पूर्ण होईल. बघता बघता सरकारचे एक वर्ष गेले. हे वर्ष कसं गेलं, हे भाजपलासुद्धा कळालं नाही. आता सरकारची पुढील चार वर्षे कशी जातील, हे सुद्धा भाजपला कळणार नाही,’ असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

‘सरकार या एक वर्षात अनेक संकटांना सामोरे गेले. कोरोनाचं संकट सर्वात मोठं होतं . राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करून कोरोनाच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्यामुळे त्याचा महसुलावर परिणाम झाला. आता सगळे पुन्हा उभा करण्याचे काम हळूहळू गेल्या महिन्यापासून सुरू झालं आहे. जनजीवन पूर्वपदावर आलं असल्यामुळे मला खात्री आहे, राज्य सरकारचं पुढच्या महिन्या-दोन महिन्यात उत्पन्न वाढेल. त्यानंतर राज्य सरकार अधिक गतीने काम करेल. शपथ घेतल्यानंतर कोरोना येईपर्यंत राज्य सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले. हे घेतलेले धाडसी निर्णय आगामी काळातही सुरू राहील,’ असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

बिहार निवडणुकीनंतरची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी एकट्याने तेथील सत्तारूढ पक्षाला घाम फोडला होता. तेजस्वी यादव यांना आणखी साथ मिळाली असती तर त्यांचे सरकार तेथे आले असते. ते एकटे लढले, त्यामुळे काठावर अपयश आलं. बिहार राज्यात जी परिस्थिती होती, त्या तुलनेत महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. येथे तिन्ही पक्ष एकत्रित आहे. या तिन्ही पक्षांच्या पुढे भाजपचा निभाव लागणार नाही, हे भाजपला सुद्धा माहीत आहे.