कॅमेऱ्यात दिसले म्हणून निरव मोदीला लगेचच भारतात आणू शकतो असे होत नाही : रवीश कुमार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. ते कॅमेऱ्यात दिसले म्हणून लगेचच त्यांना भारतात आणू शकतो असे होत नाही. असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हंटले आहे.

भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून ओळखल्या जाणारा, पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला हिऱ्याचा व्यापारी नीरव मोदी लंडनमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, ‘विजय मल्ल्याला आणण्यासाठी जितका प्रयत्न करत आहोत तितकाच प्रयत्न नीरव मोदीला आणण्यासाठी केला जात आहे. प्रत्यार्पणासाठी गरज असणारी सर्व कागदपत्रे ब्रिटन सरकारकडे सोपवण्यात आली असून त्यांनी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केलेली नाही. त्यामुळे सध्या आम्ही फक्त त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत’. नीरव मोदी लंडनमध्ये असल्याची आधीच कल्पना आहे. तो तिथे असल्याची माहिती असल्यानेच प्रत्यार्पणाची विनंती केली होती. नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. ते कॅमेऱ्यात दिसले म्हणून लगेचच त्यांना भारतात आणू शकतो असे होत नाही. असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हंटले.

कॅमेऱ्या मध्ये दिसल्या प्रमाणे, नीरव मोदीने एक जॅकेट घातलेले दिसत आहे. या जॅकेटची किंमत कमीत कमी दहा हजार पाऊंड म्हणजेत नऊ लाख रुपये असल्याचे चर्चा आहे. जवळपास दोन मिनिटांच्या व्हिडीओत पत्रकार वारंवार नीरव मोदीला प्रश्न विचारत त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांसंबंधी विचारणा करत आहे. मात्र नीरव मोदी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही. दरवेळी नीरव मोदी ‘नो कमेंट्स’ इतकीच प्रतीक्रिया देतांना दिसत आहेत.