मुख्यमंत्र्यासोबत बैठक झाल्यानंतर बाळासाहेब थोरातांचा महत्वाचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे नेते नाराज असल्याची चर्चा रंगली होती. अखेर या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्हाला चर्चा करायची होती. ती चर्चा अत्यंत सकारात्मक झाली आहे. आम्ही चर्चेतून समाधानी आहोत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी आज (गुरुवार) दुपारी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत, अनिल देसाई हे उपस्थित होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जवळपास एक तास बैठक झाली. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, काही विषय असे असतात की, समोरासमोर चर्चा झाली पाहिजे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून यावर आम्ही समाधानी आहोत. मागे मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. पण रश्मीताई यांच्या वडिलांचे निधन झालं होतं. त्यामुळे अशा दु:खाच्या प्रसंगी भेटणे योग्य नव्हते. पण माध्यमांकडून चर्चा रंगवण्यात आली. आम्ही एक कुटुंब असून आमच्यात कोणतीही नाराजी नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं.

आम्हाला काही विभागानुसार आणि प्रशासकीय समस्येबाबत प्रश्न होते. त्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करायची होती. त्यांचेही मत जाणून घेयचे होते. कोरोनाच्या परिस्थितीत काय मदत करता येईल, काय उपाययोजना करता येईल. मी स्वत: कोकणचा दौरा केला होता. कोकणात काय मदत करता येईल, अशी त्या मागची भूमिका होती. त्यामुळे या बैठकीत व्यक्तिगत अशी कोणतीही भूमिका नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

ज्यावेळी सरकार स्थापन झाले आणि आमचे मंत्रिमंडळ तयार झाले होते. मंत्रिमंडळ स्थापन करत असताना समसमान वाटपावर चर्चा झाली होती. त्यामुळे विधान परिषदेच्या जागांसाठी चर्चा करण्याची गरज नाही. लवकरच याबद्दल समसमान पद्धतीने निर्णय जाहीर होतील, अशी माहिती थोरात यांनी यावेळी दिली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून काँग्रेस कुरकुर करणारी खाट असल्याची टीका केली होती, यावर विचारले असता, या विषयावर आधीच खूप चर्चा झाली आहे. त्यामुळे यावर फारसं काही बोलण्यासरखे नाही. आजच्या बैठकीला खुद्द संजय राऊत हजर होते, असे सांगून त्यांनी यावर फाससं बोलणं टाळलं.