‘नाणार’वरून मुख्यमंत्र्यांचा बदलला ‘सूर’, शिवसेना होणार ‘दूर’ ?

राजापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सत्तेत असूनही शिवसेनेने नाणार प्रकल्पाला विऱोध केला. शिवसेनेच्या विरोधामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करावी लागली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने रत्नागिरीत आले आहेत. त्यावेळी त्यांनी नाणारचं जे झालं तेच आरेचं देखील होईल असे म्हणत मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.

नाणार प्रकल्पाबाबात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, नाणार रिफायनरी प्रकल्पाबद्दल पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. मी आगोदरपासूनच रिफायनरी नाणारला व्हावी असे म्हणत होतो, अशा शब्दामध्ये त्यांनी शिवसेनेचा उल्लेख न करता इशारा दिला आहे. रिफायनरीमुळे कोकणात 1 लाख रोजगार उपलब्ध होती. मी आगोदरपासूनच रिफायनरी नाणारला व्हावी असे घसा फोडून सांगत होतो. मात्र, आता तुमचा उत्साह पाहून समाधान वाटतंय असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती करताना शिवसेनेने नाणारचा मुद्दा लावून धरला होता. शिवसेनेनं याच मुद्यावर आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला होता. त्यामुळे नाणार प्रकल्प रद्द करावा लागला होता. त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीआधी आरेतील मेट्रो कारशेडचा मुद्दा शिवसेनेने लावून धरला आहे. नाणारचं जे झाल तेच आरेचं होणार असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख ठाकरेंनी कारशेडविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे. यानंतर आता मुख्यंत्र्यांनी थेट नाणार प्रकल्पाला गती देण्याचा मानस व्यक्त केल्याने शिवसेना-भाजपमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.