कोरोनाची तिसरी लाट कशी रोखायची? मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केल्या महत्वाच्या सूचना

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांसाठी ही लाट अत्यंत घातक असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज असून त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार असून तिसरी लाट येऊ न देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाइन लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा खनिकर्म निधीमधून घेण्यात आलेल्या ६ रुग्णवाहिका, ५० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यांचेही लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजनावर भर असणे आवश्यक आहे. १० लाख लोकांना लस देण्याची राज्याची क्षमता आहे. पण पुरेशी लस उपलब्ध होऊ शकत नाही. त्यासाठी लस उत्पादकांसोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा वाढवूनच तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात ऑक्सिजनची महत्त्वाची गरज आहे. त्यासाठी मिशन ऑक्सिजन राबविण्यात येत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे ही चांगली बाब आहे. जिल्ह्याची गरज ओळखून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवावा असे सांगत ठाकरे म्हणाले, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक सुविधा आपण उभ्या केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तत्परतेने आणि जलदगतीने सुविधा उभारण्याचे काम करत आहेत. राज्यातील औषधांचा पुरवठा सुरळीत होईल असेही त्यांनी स्पस्ष्ट केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून निश्चितच कोरोनावर मात करता येणार आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन लोकांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा व निधी देण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

उदय सामंत म्हणाले, माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी मोहीमेच्या माध्यमातून कोरोनाबाधितांचा शोध घेण्यात येत आहे. जिल्ह्याला सध्या ४ टन ऑक्सिजन पुरवठा होत आहे. त्यामध्ये आणखी २ टन वाढ करून जिल्ह्याला ६ टन ऑक्सिजन पुरवठा करावा तसेच एसडीआरएफचा निधीही सिंधुदुर्गला लवकर मिळावा अशी मागणी त्यांनी केली. लोकप्रतिनिधी, प्रशासन मिळून कोरोनाविरुद्धची लढाई सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.