…म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना मुंबईत राहण्याची विनंती केली, शरद पवारांचा खुलासा

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी राज्यात अतिवृष्टीने उभी पिके आडवी झाली आहेत. बळीराजा चिंतातूर आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्याला नियोजन करुन निर्णय घ्यावे लागतील. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. उस्मानाबाद येथील तुळजापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या शरद पवार मराठवाड्याच्या अतिवृष्टी झालेल्या परिसराचा पाहणी दौरा करत आहेत.

यावेळी शरद पवार म्हणाले, अतिवृष्टीमुळे गावपातळीवरील रस्ते खराब झाले त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. अतिवृष्टीचा परिणाम ऊस पिकावरही झाला, आधी कधी आलं नाही असं संकट यंदा राज्यावर आलं. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, पंढरपूर, इंदापूर, सोलापूर या ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. नुकसान भरुन काढण्यासाठी कर्ज काढण्या शिवाय पर्याय नाही त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्यास आग्रह करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

केंद्र सरकारने राज्याला मदत करावी

महाराष्ट्रावर ऐतिहासिक आर्थिक संकट आहे. संपूर्ण संकटाचं ओझं एकट्या राज्य सरकारला झेपेल का ? केंद्र सरकारला मदत करावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला ही बातमी वाचली, निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात बोलतो, पण अशा संकटावेळी मदत करण्याची भूमिका घेतो, कारण हे राष्ट्रावरील संकट आहे. देशाच्या संकटांना तोंड देण्यासाठी सगळे एकत्र येतो, भाजपा सरकार असताना गुजरातमध्ये भूकंप झाला त्यासाठी माझ्यावर जबाबदारी दिली होती, निर्णय घेताना पक्ष बघितला जात नाही, असेही शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मुंबई का सोडत नाहीत ?

53 वर्षात विधानसभा, लोकसभा, राज्यसभा यात मी काम केलं त्यात एकही दिवस लोकांनी सुट्टी दिली नाही, संकटात मी बसू शकत नाही, माझ्या हातात प्रशासनाची जबाबदारी नाही, संकटात लोकांना भेटावं लागेल पण ज्यांच्या हातात सत्तेचा कारभार असतो त्यांना अनेक ठिकाणी लक्ष द्यावं लागतं, त्यामुळे मुंबईत एका ठिकाणी राहून सगळ्या जिल्ह्यांशी संपर्क साधून निर्णय घ्या अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती, आम्ही सगळे नेते, इतर मंत्री फिल्डवर फिरत आहोत, त्याच आढावा आम्ही त्यांना देत असतो. एका जागेवर बसून प्रशासनाचे नियोजन करुन निर्णय घ्यावे लागतात, असं सांगत ठाकरे मुंबई का सोडत नाही, या विरोधकांच्या प्रश्नावर शरद पवार यांनी यावेळी उत्तर दिलं.