‘घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्ष मदत करू’, CM उध्दव ठाकरेंचा फडणवीसांना चिमटा

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली असून परतीच्या पावसाचे संकट टळलेलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुढील २ ते ३ दिवसांत माहिती गोळा करण्याचे काम होईल, मग सरकारकडून जे शक्य आहे ते करणार आहे, घोषणा देणारे गेले आम्ही प्रत्यक्षात काम करु, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाला लगावला. ते सोलापुरात वार्ताहरांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पावसाळा सुरु झाल्यापासून मी सतत संपर्कात आहे, नुकसान किती होतेय, पावसाचा अंदाज याची माहिती घेत होतो. टार्गेट दिल्यासारखे पाऊस सगळीकडे कोसळतोय. शेतकरी आणि आपत्तीग्रस्त हे संकटाच्या डोंगराखाली अडकलेले आहेत. त्या लोकांना दिलासा आणि धीर देण्याकरता आम्ही इथे आलो आहे. लोकांसाठी सरकारकडून शक्य आहे तेवढे आम्ही करु, सरकार तुमचे आहे, परतीचा पाऊस आणखी किती दिवस असेल, त्याचा फटका कितपत बसेल याचा अंदाज आला आहे. दुर्दैवाने ज्यांच्या घरातील माणसे दगावली त्यांना काही दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही केला. सावध राहा, प्राणहानी होऊ नये, अशा सूचना प्रशासनास दिल्याचे त्यांनी म्हटलं.

केंद्र सरकार हे देशाचे सरकार, परदेशाचे नाही
तद्वतच केंद्राकडे मदत मागितली म्हणून झाले ? पंतप्रधान मोदींनी फोन करुन सांगितलं आहे, चिंता करु नये आवश्यक मदत करणार, असे आश्वासन दिल आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज पाणी आहे, त्यांनी काय बोलावे, मागावे यापेक्षा त्यांचे दुःख ओळखून आम्ही त्यांना मदत देणार आहोत. बिहारला जाण्याऐवजी दिल्लीत जावे मग पंतप्रधान सुद्धा घराबाहेर पडतील, केंद्र सरकार हे देशाचे सरकार आहे, परदेशाचे नाही, राज्याची आणि देशाची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे, पक्षपातीपणाने बघू नये. बिहारमध्ये प्रचारास जाण्यापेक्षा राज्यातील संकटासाठी एकत्र केंद्राकडे जाऊ. मी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बसलो नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या टीकेस प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते ?
अतिवृष्टीने संपूर्ण पिकाचे नुकसान झाले आहे, जनावराला चाराही उरला नाही, पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर कोणी आलं नाही, १०० टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे वगैरे करण्याच्या भानगडीत सरकारने न पडत तातडीने मदत केली पाहिजे, जनावरांना चारा दिला पाहिजे, त्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलावी. गेल्या वर्षी पूरस्थिती निर्माण झाल्यावर मी १० हजार कोटी तातडीने मदत जाहीर केली होती. आमचा दौरा घोषित होईपर्यंत कोणताही पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकले नव्हते, आम्ही दौरा करायला लागल्यावर सर्वजण आता घराबाहेर पडतआहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला होता. त्यावरती सोलापूरमध्ये वार्ताहरांना बोलताना मुख्यमंत्र्यांनी प्रतिटोला लगावला आहे.