एकनाथ खडसेंना ED कडून 28 जानेवारीपर्यंत दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना ED कडून दिलासा मिळाला आहे. खडसे यांनी त्यांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हा रद्द करावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुढील सुनावणीपर्यंत खडसेंना अटक करण्यात येणार नाही, अशी माहिती ‘ईडी’च्या वकिलांकडून न्यायालयात देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते खडसे यांच्यावर पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथे कोट्यवधी रुपयांची जमीन लाटल्याचा आरोप लावला होता. खडसे यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन येथे गुन्हा दाखल झाला होता. यानंतर ईडीने ECIR दाखल केला होता. मात्र, ईडीकडून ECIR रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका खडसे यांनी दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली. मात्र, सुनावणी आज सोमवारी (दि. 25) पूर्ण होऊ शकली नाही. या याचिकेवरील पुढील सुनावणी गुरुवारी (दि. 28 जानेवारी) रोजी होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत खडसे यांना अटक करणार नाही, असे ईडीकडून मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले.

ईडीतर्फे न्यायालयात अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला. ईडीने ECIR दाखल केला आहे. हा चौकशीचा भाग आहे. हा काही गुन्हा नाही. ईडीला चौकशीला बोलवायचा अधिकार आहे. समन्स पाठवले म्हणजे तो व्यक्ती आरोपी आहे असे होत नाही, असा युक्तिवाद अनिल सिंग यांनी यावेळी केला. तर एखादी व्यक्ती तपासात सहकार्य करत नाही, या मुद्यावर ईडी एखाद्याला अटक करू शकते. तशी कायद्यात तरतूद आहे. यासाठी आम्ही ECIR रद्द करण्याची मागणी केली आहे, असा युक्तिवाद वकील पोंडा यांनी खडसे यांच्या वतीने उच्च न्यायालयात केला आहे.