Coronavirus : मुंबई-पुण्यात घराबाहेर पडताना मास्क ‘बंधनकारक’, उल्लंघन केल्यास ‘केस’ होणार दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने कहर केला आहे. कोरोनाग्रस्तांचा आणि मृतांचा सर्वाधिक आकडा महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्यात आणखी खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाचा सर्वात प्रादुर्भाव मुंबई आणि पुणे शहरात आहे त्यामुळे खबरदारीचा इशारा म्हणून महाराष्ट्र सरकारने आदेश जारी केला आहे की मुंबई, पुणे शहरातील सरकारी कार्यालयात जाताना मास्क वापरणे अनिवार्य आहे.

मुंबई अत्यावश्यक सेवेसाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने घराबाहेर पडताना मास्क घालणं मुंबई महानगरपालिकेने अनिवार्य केल्यानंतर राज्य सरकारकडून हा आदेश देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार जेव्हा कोणीही मुंबई शहर परिसर आणि पुणे शहर परिसरातील कोणत्याही सरकारी कार्यालयात जाईल तर त्या कार्यालयात मास्क घालूनच जावे, या शहरातील सर्व सरकारी कार्यालयात मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेने देखील असे आदेश जारी केले आहेत. जर कोणी घराबाहेर पडताना मास्क वापरले नाही तर आयपीसी कलम 188 नुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

मास्क घालण्याबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे –
करोनाचा धोका पाहता आपल्याला अधिक सावध राहण्याची गरज आहे. घराबाहेर पडताना प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. केवळ आताच नाही, हे संकट दूर झाल्यानंतर देखील पुढील काही दिवस हे करावे लागेल. त्यासाठी दुकानातच जायला पाहिजे असे नाही. हा मास्क घरातीलच चांगल्या कापडाच्या दोन – तीन घड्या करुनही बनवात येईल. स्वच्छ धुवून तो पुन्हा वापरता येईल. मात्र, या मास्कचा वापर छत्रीसारखा करु नका. बाहेर जाताना एखाद्या छत्रीसारखा उचलला मास्क आणि निघालात असे करु नका. प्रत्येकाने स्वत:चाच मास्क वापरायचा आहे. स्वच्छ गरम पाण्याने धुवून, सुकवून वापरा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.