Weather Alert : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धोका कायम, पुढील 3 दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत पावसाची हजेरी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवसांपासून कोल्हापूर, सांगली, पुणे, सातार या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग दाटले आहेत. हीच स्थिती पुढील तीन दिवस राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज (मंगळवार) अहमदनगर, जालना, औरंगाबाद, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यापासून राज्यातील तापमानाचा पारा घसरला आहे. तर सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना उकाडा जाणवत आहे. गेल्या आठवड्यात विदर्भात तापमानात उच्चांकी वाढ झाली होती. त्यामुळे यंदाचा उन्हाळा शरीराची लाहीलाही करणार असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतु अवकाळी पावसाने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा धोका कायम राहणार आहे. राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. भारतीय हवामान खात्यानं उपग्रहाद्वारे घेतलेल्या फोटोमध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगांच्या हालचाली नोंदवण्यात आल्या आहेत. आज मराठवाड्यातील काही भागांमध्ये वेगाने वारे वाहतील. तसेच विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
Over Maharashtra we see today afternoon convective clouds 🌧⛈🌩 development as seen from the latest satellite image.
IMD has already issued warnings, please keep watch. pic.twitter.com/eCQm8rX0SA— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 13, 2021
याशिवाय आज उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तर कोकण वगळता इतर भागात आज वारा 50 किमी प्रतितास वेगाने वाहणार आहे. तर पुढील तीन ते चार तासांत अहमदनगर, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली आणि रायगड या जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.