राज्यात पुढील तीन दिवसांत ‘या’ ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पाऊस, हवामान विभागाने जारी केला ‘यलो’ अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचं संकट समोर उभे असताना आता हवामानातील बदलामुळे आणखी एक संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं आहे. उत्तर भारतात तुफान पाऊस आणि गारा पडत असताना आता राज्यात देखील हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई,कोकणासह रिमझिम पाऊस तर चार जिल्ह्यामध्ये गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाचं संकट आलं आहे. जानेवारी महिन्यात ऐन थंडीच्या दिवसांमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस होत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पुढील तीन दिवस पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात 6 ते 9 जानेवारी दरम्यान बीड, जालना, अकोला आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कुलाबा वेधशाळेकडून 18 जिल्ह्यात यलो अलर्ट

कुलाबा वेध शाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर, जालना, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, यवतमाळ, वाशीम, वर्धा, अकोला, नागपूर, बुलडाणा, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.