मंत्र्याच्या मुलीचे मनाविरुद्ध लग्न; मुलीने घर सोडून गाठले सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

मनाविरुद्ध लग्न लावल्याच्या नाराजीतून घर सोडून निघून गेलेल्या तरुणीला सुप्रीम कोर्टाने तिला आधार दिला आहे. सासर आणि माहेरशी संबंध तोडून तरुणीने स्वतःच्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगावे, असे सर्वोच्च न्यायालयाने तिला सुचवले आहे.

घर सोडून गेलेली 26 वर्षीय तरुणी कर्नाटकातील एका मंत्र्याची कन्या आहे. प्रियकराशी लग्न करण्याची इच्छा असतानाही पालकांनी दुसऱ्याच तरुणासोबत तिची सोयरीक जुळवली. चिडून तिने गुलबर्गातील घर सोडले आणि दिल्ली गाठली. सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर तिला दिल्ली पोलिस आणि महिला आयोगाकडून संरक्षण पुरवण्यात आले.

बंगळुरमध्ये जाऊन आपल्या इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्सची पदवी मिळवण्याची इच्छा तरुणीने व्यक्त केली. ‘तू सज्ञान आहेस. तुला हवे तिथे तू जाऊ शकतेस, आणि इच्छा असेल ते शिक्षण घेऊ शकतेस’ असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टिस ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने तिला सांगितले.

दरम्यान ,पती आणि पालकांकडून तरुणीच्या जीवाला धोका असल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले. ‘आईच्या पाठिंब्याने तरुणीच्या भावाने तिला बलात्कार करण्याची धमकी दिली आहे’ असे सांगत वकिलांनी संभाव्य धोक्यापासून तिला संरक्षण देण्याची मागणी केली. ‘सज्ञान व्यक्तींना इच्छा असेल तिथे जाण्याचे स्वातंत्र्य आहे. एखाद्या तरुणीच्या आयुष्यात तिचे पालक, कुटुंबीय, पती किंवा त्याचे कुटुंबीय अडथळा आणू शकत नाहीत’ असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.