वजन कमी करताना येणारा अशक्तपणा धोकादायक

पोलिसनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्याच्या चूकीच्या पद्धतीमुळे अशक्तपणा येऊ शकतो. हा अशक्तपणा आरोग्यासाठी खूपच हानिकारक असतो. लठ्ठपणाप्रमाणे अशक्तपणादेखील धोकादायक आहे. दुबळ्या लोकांचे शरीर योग्यरीत्या पोषण शोषण्यास सक्षम नसतात. अशा परिस्थितीत कॅल्शियम पुरेशा प्रमाणात नसल्याने हाडे मजबूत होत नाहीत. अशक्त लोकांमध्ये रक्ताचा अभाव ही सर्वांत सामान्य समस्या आहे. बरेचदा रक्त तपासणीसाठीदेखील पुरेसे रक्त मिळत नाही.

चरबी नसल्यामुळे त्वचेवर चमक दिसत नाही. त्वचेवरील रुक्षपणा पोषणाच्या कमतरतेचा परिणाम आहे, ज्यामुळे शरीरावरील चमक कमी होते. त्वचा निर्जीव दिसते. शरीराला पुरेसे पोषण न मिळण्याने शक्तीदेखील कमी होते आणि थोड काम केले तरी थकवा येतो. दुबळ्या लोकांना यकृत समस्या किंवा त्यांच्याशी निगडित आजारांमुळे सामान्य शरीर असलेल्या लोकांपेक्षा जास्त धोका संभवतो.

अशक्तपणा हा फक्त शरीराशी संबंधित नसून मानसिक आरोग्याशीदेखील संबंधित आहे. दुबळ्या लोकांमध्ये उदासीनतेची समस्या वेगाने पसरते. अशक्तपणामुळे शारीरिक वाढ मंदावते. कारण अशक्त शरीर सामान्य शरीरासारखे पोषण शोषण्यास सक्षम नसते. रोग प्रतिकारक शक्ती कमी होत गेल्याने दुबळ्या व्यक्ती नेहमी आजारी पडतात.