…म्हणून गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांनी काँग्रेस सोडावी : रामदास आठवले

पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांची निवड करण्यात यावी, असे मागणी करणारे पत्र लिहिणार्‍या नेत्यांमध्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल दोघेही होते. आझाद आणि सिब्बल यांच्यावर पक्षातून टीका करण्यात आली आहे. टीकेचा हवाला देत या दोन्ही नेत्यांना काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याची ऑफर मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर मोठे बदल करण्याची मागणी केली होती. या पत्रावर गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांच्याही स्वाक्षर्‍या होत्या. या पत्रानंतर झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत दोन्ही नेत्यांवर टीका झाली होती. त्यानंतर त्यावर पक्षाकडून आणि दोन्ही नेत्यांकडून पडदा टाकण्यात आला. या पक्षातंर्गत वादानंतर गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांना रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपात येण्याची ऑफर दिली आहे. काँग्रेसच्या पक्ष बांधणीसाठी गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांनी प्रचंड मेहनत घेतली. जर राहुल गांधीजी त्यांच्यावर आरोप करत असतील, तर त्यांनी पक्ष सोडावा. भाजपामध्ये त्यांचं स्वागत करण्यास तयार आहोत, अशी ऑफर आठवले यांनी दिली आहे.