भाजपमुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला; ममतांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. तृणमूल काँग्रेस आपली ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत तर भाजपही आपली ताकद दाखवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. सध्या दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडत आहे. दुसरीकडे मात्र देशात कोरोनाने कहर केला आहे. दिवसागणिक बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं मात्र भाजपामुळे संसर्ग पुन्हा वाढला असल्याची टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका सभेला संबोधित करताना केली आहे.

ममता म्हणाल्या, निवडणुकांमुळे प्रचार जोरात सुरु आहे. मात्र कोरोना परिस्थितीवर आम्ही काही दिवसापूर्वी नियंत्रण मिळवले होते. मात्र प्रचारासाठी भाजपने बाहेरील राज्यातील लोकांना बोलावले त्यामुळे राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला.

लसीकरणामुळे कोरोनाला रोखता येत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लसीकरणासंदर्भात केलेल्या मागणीला केंद्र सरकार प्रतिसाद देत नसल्याचे सांगत भाजपवर हल्लबोल केला.

काही दिवसापूर्वी कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये मतदानादरम्यान तृणमूल आणि भाजपचे काही कार्यकर्ते हे आपापसात भिडले. या मध्ये अनेक लोक जखमी झाले होते. दरम्यान, यावेळी गोळीबार करण्यात आला होता त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले होते. त्यावरूनही ममतांनी भाजप आणि अमित शहांवर सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या, कूचबिहारचा गोळीबार पूर्वनियोजित असून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निर्देशावर कट रचण्यात येतो असा गंभीर आरोप करत अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी मागणी केली. केंद्रातून सीआयएसएफवर मतदानासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या मतदारांवर गोळीबार करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप करताना ‘अमित शहांनी या घटनेचं उत्तर द्यावं’ असं आव्हान ममता बॅनर्जींनी दिल होत.