कोथिंबीर खाल्ल्यानं खरंच फायदा होतो का ? जाणून घ्या ‘हे’ 12 मुद्दे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोथिंबीर खाल्ल्यानं खरंच फायदा होतो का आणि होत असेल तर नेमका काय आणि कसा फायदा होतो हे आज आपण 12 पॉईंट्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

1) रोज ताज्या कोथिंबीरीची 1-2 चमचे चटणी जेवणात खाल्ली तर अपचन, आम्लपित्त, अन्नावरील वासना कमी होणं, पोटात गुब्बारा धरणं, अल्सर, मुळव्याध आदी विकार होत नाहीत.

2) रोज सकाळी 10-12 कोथिंबीरीची पानं आणि 7-8 पुदीन्याची पानं उकळून घेतली तर शरीरातील विषारी घटक हे शौच आणि लघवीद्वारे बाहेर पडतात. इतकंच नाही तर शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होतं.

3) डोळ्यांची आग, डोळ्यांखाली काळी वर्तुळं होणं, डोळे कोरडे होणं, डोळे क्षीण होणं अशा डोळ्यांच्या अनेक विकारांवर कोथींबीर उपयोगी ठरते. कोथिंबीरीचा ताजा रस काढून त्यात 4-5 चमचे पाणी मिसळून हा रस गाळून घ्यावा व ते पाणी डोळ्यात 2-3 थेंब सोडावं.

4) शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच शरीराचा थकवा जाऊन उत्साह वाढवण्यासाठी 2 चमचे धने, अर्धा इंच आलं एक ग्लास पाण्यात उकळून घ्यावं. हे पाणी गूळ घालून आटवावं. तयार झालेल्या धन्याचा चहा प्यावा. हा चहा पिल्यानं भूकही वाढते.

5) अन्नपचन नीट न झाल्यानं जुलाब होत असतील तर अशा वेळी धन्याचा ग्लासभर पाण्यात काढा तयार करून प्यावा. यामुळं आराम मिळेल.

6) आम्लपित्तामुळं घसा आणि छातीत जळजळ होत असेल व घशात आंबटपाणी येत असेल तर एक चमचा धनेपूड व 1 चमचा खडीसाखर (बारीक केलेली) यांचं मिश्रण दिवसातून 2-3 वेळा घ्यावं. यामुळं आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

7) स्थूलता कमी करायची असेल तर एक चमचा धने, एक चमचा आवळा पावडर, अर्धा इंच आलं हे मिश्रण पाण्यात उकळून ते पाणी प्यावं.

8) उष्णतेमुळं हातापायांची जळजळ होत असेल तर एक चमचा धने व जिरे रात्री पाण्यात भिजत घालावे. सकाळी उठल्यानंतर पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून प्यावं.

9) गर्भवती महिलांना अनेकदा उलटीचा त्रास होतो. अशा वेळी धने पूड एक चमचा आणि 10 ग्रॅम खडीसाखर हे पाण्यात मिसळून ते पाणी थोड्या थोड्या वेळानं घोट घोट पीत रहावं.

10) धने हे सुगंधी, दीपक, पाचक, मुखशुद्धीकारक असतात त्यामुळं बडीशेपमध्ये मिसळून त जेवणानंतर खावेत. त्यामुळं मुख दुर्गंधी दूर होते व पोटातील गॅसही कमी होतो.

11) मुत्र प्रवृत्ती होत नसेल व लघवीला आग होत असेल तर अशा वेळी 4 चमचे धने रात्री 8 ग्लास पाण्यात भिजवून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी उकळून घ्यावं. थंड झाल्यावर हे पाणी दिवसभर पित रहावं. यामुळं लघवीची जळजळ दूर होते आणि मुत्र प्रवृत्ती वाढते.

12) खोकल्यावर खात्रीशीर उपाय म्हणून धन्याचा उपयोग केला जातो. धनेपूड, सुंठ व पिपळी चूर्ण समप्रमाणात घेऊन मधातून सकाळ संध्याकाळ चाटण करावं. असं केल्यानं खोकला हळूहळू कमी होऊन नष्ट होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.