‘गुन्हेगाराचा अंत झाला पण गुन्ह्यांचं आणि त्यास संरक्षण देणार्यांचं काय ?’, प्रियंका गांधींचा सवाल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुख्यात गँगस्टर विकास दुबेला आज सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. त्यानंतर आता या चकमकीसंबंधी राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सुद्धा ट्विट केले आहे. गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणार्याचे काय? असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
प्रियंका गांधी त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. मागच्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून त्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहेत. वेळोवेळी त्यांनी वेगवेगळया मुद्दांवरुन योगी सरकारला घेरले आहे. काल विकास दुबेला मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून अटक झाल्यानंतर त्यांनी योगी सरकारवर टिका करणारे ट्विट केले होते. कानपूर हत्याकांडमध्ये उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड अलर्ट राहून काम करणे अपेक्षित होते. पण ते अपयशी ठरले. अलर्ट असूनही आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचला असे गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
अपराधी का अंत हो गया, अपराध और उसको सरंक्षण देने वाले लोगों का क्या?
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 10, 2020
कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा आज सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये खात्मा केला. दुबेला काल मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरात अटक करण्यात आली होती. त्याला उत्तर प्रदेश एसटीएफचे पथक आज कानपूरला घेऊन येत असताना ताफ्यातील एक वाहन पलटी झाले. त्यानंतर दुबे पोलिसाचे शस्त्र हिसकावून पळण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी प्रत्युत्तरादाखल यूपी एसटीएफने केलेल्या कारवाईत विकास दुबे ठार झाला.