मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे ? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. यानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी बैठकीत केलेल्या सूचनांबाबत माहिती दिली. तसंच शहराच्या एन्ट्री पॉईंटवर नियम कडक करायला हवे. प्रत्येक वेळी माणुसकी उपयोगाची नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंच्या सरकारला 9 सूचना
1. छोटे दवाखाने सुरु करावेत. तिथे एखाद्या पोलिसांची नेमणूक करावी
2. कन्टेन्मेंट झोनमध्ये फोर्स वाढवा. काही ठिकाणी SRPF चे जवानही तैनात करावे.
3. स्पर्धा परीक्षांसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहचवण्याची व्यवस्था करावी
4. तपासणी केल्याशिवाय परप्रांतियांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नका
5. राज्य स्थलांतरित कायद्याखाली परप्रांतियांची नोंद करावी
6. महाराष्ट्रातील तरुण-तरुणींपर्यंत रोजगाराची माहिती पोहोचवावी
7. शाळा कशा सुरु करणार ? पालकांपर्यंत ही माहिती पोहचवणं गरजेचं आहे.
8. महापालिका कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस कर्मचारी यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.
9. लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे ? तो लवकरात लवकर महाराष्ट्रासोमोर ठेवावा
चुका आणि त्रुटी काढायची वेळ नाही.
सरकार कसं काम करत आहे असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, सरकार उपलब्ध साधनांच्या आधारे काम करत आहे. सरकारच्या कामात काही चुका आणि त्रुटी असतीलही. मात्र, ही वेळ त्रुटी आणि चुका दाखवण्याची नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.