पंजाब, हरियाणा आणि यूपीमधील शेतकर्‍यांनी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकला, HM अमित शाहंनी केले ‘हे’ आवाहन

नवी दिल्ली, चंदीगड, मेरठ : नवीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी एकीकडे दिल्लीच्या सिंघु आणि टिकरी सीमेवर तळ ठोकून बसले आहेत, तर यूपी सीमेवर सुद्धा भारतीय किसान युनियन (भाकियू) नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येने शेतकरी जमले आहेत. तर, हरियाणाच्या शेतकर्‍यांनी सुद्धा अनेक ठिकाणी रस्ते रोखले आहेत. दिल्ली सीमेवर सुद्धा त्यांनी निदेर्शने केली. पंजाब, हरियाणा आणि यूपीचे हजारो शेतकरी शनिवारी दिल्लीच्या दिशेने निघाले आणि दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकला आहे. आणि येथूनच ते पुढील रणनिती ठरवणार आहेत.

केंद्र सरकार चर्चेसाठी तयार : अमित शाह
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत येण्यासाठी सीमेवर तळ ठोकून बसलेल्या शेतकर्‍यांना आंदोलन संपवण्याचे आवाहन केले असून त्यांना चर्चेला येण्याचे आवाहन केले आहे. शाह यांनी म्हटले की, शेतकर्‍यांच्या सर्व समस्या आणि मागण्यांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 3 डिसंबरला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. दुसरीकडे, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन मान्य करून शेतकर्‍यांना आंदोलन योग्य दिशेने नेल्यास मार्ग लवकरात लवकर निघेल, असे आवाहन केले आहे.

भारतीय शेतकरी संघटनेचे नेते शिंगरा सिंह म्हणाले की, हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मेहम येथे रात्रीची विश्रांती घेतल्यानंतर आम्ही सकाळी पुन्हा दिल्लीला निघालो. शेतकर्‍यांच्या आणखी एका गटाने हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील जुलाना येथे रात्रीची विश्रांती घेतली आणि त्यांनी दिल्लीचा प्रवासही सुरू केला आहे. किसान मजदूर संघर्ष समिती (केएमएससी) च्या बॅनरखाली मोठ्या संख्येने शेतकरी राजधानीत येण्यासाठी पंजाबहून हरियाणाच्या सीमेवर दाखल झाले आहेत.