‘या’ कारणामुळे अनुष्का शर्माला कॉल करून खूप रडला विराट कोहली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा उद्या म्हणजेच १ मे रोजी आपला ३१ वा वाढदिवस साजरा करणार आहे. उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध अशा अयोद्धेत अनुष्काचा जन्म १ मे १९८८ रोजी झाला होता. अनुष्काने २००८ साली आलेल्या रब ने बना दी जोडी या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर आलेला तिचा सिनेमा ‘बँड बाजा बारात’ हिट ठरला. अनुष्काने तिच्या ११ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबत तिने लग्नगाठ बांधली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्काच्या शर्माचे अभिनेता रणवीर सिंग, शाहिद कपूर, अर्जुन कपूर, सुरेश रैना, जोहेब युसूफ आणि रणबीर कपूर अशा अनेकांसह अफेअरच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु अखेर भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीसोबत तिने २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाआधी विराट आणि अनुष्का चांगलेच चर्चेत राहिले आहेत.

विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर विराट क्रिकेटच्या मैदानावर जेवढा आक्रमक दिसतो तेवढाच तो खऱ्या आयुष्यात संवेदनशील आहे. एका मुलाखतीत विराटने स्वत: याबाबत खुलासा केला आहे. त्याने सांगितले की एकदा अनुष्का सोबत कॉलवर बोलताना तो खूप रडला होता. विराट म्हणाला की, “मला कॉलवर क्रिकेट टीमचा कॅप्टन बनल्याचे सांगण्यात आले होते. हे ऐकल्यानंतर मी अनुष्काला कॉल केला होता.”

पुढे विराट म्हणतो की, “त्यावेळी मला माझ्या करिअरच्या सुरुवातीचा काळ आठवत होता. कारण मी कधीच विचार केला नव्हता की, माझं करिअर एका क्रिकेट अ‍ॅकॅडमीपासून एक टेस्ट कॅप्टन बनण्यापर्यंत पोहोचेल.” हे सांगताना विराटच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. विराटला २०१७ मध्ये भारतीय टीमचा टेस्ट कॅप्टन बनवण्यात आलं होतं.