राज्यात सप्टेंबरच्या शेवटी शाळा सुरू होणार ? शिक्षण मंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रसार वाढला असून आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १० लाख ७७ हजार ३७४ झाली आहे. तथापि, अनलॉक ४ सुरु असून उद्योग धंदे आणि सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, शाळा कधी सुरु होतील याबाबत अनिश्चितता कायम असताना. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सप्टेंबर अखेर शाळा सुरु होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

२१ सप्टेंबरपासून ज्या संस्था शाळा सुरु करु शकतात, अशांनी सुरु कराव्यात असे केंद्र सरकारने म्हटलं होत. पण राज्यातील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील संस्थाचालक तसेच शिक्षक तज्ञांसोबत चर्चा केली असता. अनेक शिक्षक आणि संस्थाचालकांनी ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा सुरु करण्यास तूर्तास हरकत घेतली आहे.

अद्याप तरी इयत्ता १० वी आणि ९ वी च्या तुकड्या सुरु करण्याचा विचार नसून, शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने सप्टेंबर अखेर शाळा सुरु करण्याबाबत बहुतेक प्रतिकूल मत आहे, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. तसेच आता यासंदर्भात राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने २१ सप्टेंबरपासून शाळा सुरु होणार असल्याचे जाहीर केले होते. असे असले तरी ऑनलाईन आणि डिस्टन्स लर्निंगला यापुढे परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विध्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीचे पत्र आवश्यक करण्यात आले आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार आहेत.