जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविणारे ‘सपनों के सौदागर’ गेले कुठे ? : धनंजय मुंडे

कर्जत : पोलीसनामा ऑनलाईन – मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखविणारे सपनो के सौदागर गेले कुठे ? मोदी आता अच्छे दिनवर का बोलत नाहीत असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या निवडणूक प्रचारासाठी नेरळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. या सभेला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, आमदार सुरेश लाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मोदींवर टीका करताना धनंजय मुंडे म्हणाले की, ‘मोदींनी २०१४ मध्ये अच्छे दिन आणण्याची स्वप्ने दाखवली होती. जनतेने भुलून मोदींना बहुमत दिले मात्र मोदींनी काय केले ? मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखविणारे सपनो के सौदागर गेले कुठे? मोदी आज देशात सर्वत्र अपयशी ठरल्याचे दिसून येत असून ते आता २०१९ मध्ये अच्छे दिनबद्दल काही बोलत नाही.’ नरेंद्र मोदी चुकून कधी पंतप्रधान झाले तर ते देशात पुन्हा हुकूमशाही आणतील, अशी भीती मुंडे यांनी व्यक्त केली.

याच सभेत धनंजय मुंडेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना धनंजय मुंडें म्हणाले की, ‘कोणतेही पद नसताना आर्थिक संपत्ती कमावली म्हणून ईडीकडून चौकशीची धमकी अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना दिली आहे त्यामुळे अमित शहा यांना अफजल खान बोलणारे अफजल खानाच्या गुहेत शिरले आहेत. ‘

राज्यात परिवर्तन आणून चोर लोकांच्या हाती सत्ता देऊ नका, असे आवाहन प्रचारसभेत मुंडे यांनी केले.