‘एकटं यायचं की आघाडी करून हे आमचे वरिष्ठ ठरवतील, आम्हाला कुणी बिनकामाचा सल्ला देऊ नये’ : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुका राज्यात नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीने भाजपाला अनेक ठिकाणी धूळ चाखली. दरम्यान या निवडणुकाच्या निकालानंतर महाविकास आघाडी नेते मंडळी व भाजप नेते मंडळी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली.

त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एक एकट्याने आमच्याशी लढावे असे खुले आव्हान दिलं. याला जोरदार प्रतिउत्तर राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं.

आम्ही पराभव स्वीकारतो आणि चिंतन करतो, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…
आम्ही आघाडी करून लढायचे की एक एकट्याने या संबंधीचा निर्णय आघाडीतील सहभागी पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील. आम्हाला कुणी बिन कामाचा सल्ला देण्याची काहीही आवश्यकता नाही. एकत्रितपणे लढण्याचे परिणाम या निवडणुकीच्या निकालातून समोर आले आहे. सर्वच मतदारसंघात आघाडीतील पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी एकत्रित पणे काम केले. त्यामुळे पुढील काळात अधिकाधिक आघाडीचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या वेगळे लढण्याने जर विरोधकांचा फायदा होणार असेल तर तसे अजिबात होता कामा नये. आम्ही पराभव स्वीकारतो आणि चिंतन करतो, अशी भूमिका चंद्रकांत दादांनी करणे अपेक्षित होते. मात्र ते दावे करीत आहे. माझ्यासारखा माणूस जर त्यांच्या जागी असता तर खुल्या मनाने पराभव मान्य केला असता. तसेच आम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आम्हाला एवढा दारुण पराभव का झाला याचं चिंतन करुन वगैरे वगैरे. पण तो देखील दिलदारपणा दाखवण्याची दानत त्यांच्या लोकांची नाही. परंतु, ठीक आहे, त्यांचे त्यांना लखलाभ” अशा शब्दात अजित पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक निकालांमध्ये महाविकास आघाडीने भाजपला चितपट करत धक्का दिला. यश संपादन केलं. पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही भाजपला दारुण पराभव झाला. आता या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपला लक्ष्य केले जात आहे. आता अजित पवारांनी भाजपवर टीका केली आहे.