प्रकाश आंबेडकरांचा केंद्र, राज्य सरकारला सवाल, म्हणाले – ‘लसींच्या दराबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री गप्प का?’

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण त्यासाठी जाहीर केलेले दर हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. सरकारने खर तर मोफत लस देणे गरजेचे आहे. लसीच्या दराबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुखमंत्री उद्धव ठाकरे कुठेही दिसत नाहीत, सर्व निर्णय अजित पवारच जाहीर करत असतात. त्यामुळे सध्या खरे मुखमंत्री कोण आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार पारिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. लसीबाबत भारताने लवकर निर्णय घ्यावा. लसीचे उत्पादन आपल्याकडे होत आहे. तरी लस आपल्याकडे महाग कशी ? सगळ्यांना 150 रुपयात लस द्यावी अन्यथा राज्यभर धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. संचारबंदीमुळे साखळी तुटलेली नाही. ती तोडण्यासाठी बधितांचे संपर्क तपासणे महत्वाचे आहे. तसेच देशात लोक वाचवण्याला प्राधान्य द्या. जसे इंग्लंड, रशियामध्ये त्यांनी आपली लोक वाचवणे प्राधान्य आहे, असे सांगितले. आपण ही भूमिका का घेतली नाही ? या देशात आपल्याकडूनच लसी पुरवण्यात आल्या होत्या, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत ते म्हणाले, पंतप्रधान निधीत किती निधी आला याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली नाही. माझ्या माहितीप्रमाणे हजार कोटींपेक्षा अधिक पैसे आले आहेत. पंतप्रधानांचे प्राधान्य बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवणे होते. शहा आणि मोदी यांनी मिळून 294 सभा घेतल्या होत्या. कोरोना वाढत असताना मोदी निरो सारखे वागत होते. रोम जळताना निरो व्हायोलिन वाजवत होता तसे यांचे लक्ष बंगालवर होते, असे ते म्हणाले. केंद्र आणि राज्यानी योग्य दक्षता घेतली नाही. यापुढे अशी परिस्थिती येऊ नये यासाठी पक्षातील सल्लागारांची मते घेत बसू नका. सामंजस्य असणाऱ्या व्यक्तींना घेऊनच चर्चा करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.