‘दोन्ही मंत्री सत्तेत मश्गुल, कर्मचाऱ्यांविना हॉस्पिटल सुरु का केले ?’, किरीट सोमय्यांचा सवाल

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना रुग्णांची महापालिका थट्टा करत असून, त्यांच्याशी क्रूरपणे वागत आहे. तर ठाण्यातील दोन्ही कॅबिनेट मंत्री सत्तेत मश्गुल आहेत. वैद्यकिय कर्मचाऱ्यांची पुरेशी व्यवस्था नव्हती. तर 1000 खाटांचे हॉस्पिटल सुरु करण्याचा अट्टाहास का केला, आणखी हॉस्पिटल उभारण्याची तयारी का केली जात आहे, असा सवाल भाजपचे प्रभारी किरीट सोमय्या व आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे. तसेच गायकवाड, सोनवणे आणि मोरे कुटुंबीयांच्या भावनांशी खेळणाऱ्या हॉस्पिटल व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी केली.

ग्लोबल हब येथील रुग्णालयात भालचंद्र गायकवाड यांचा मृतदेह जनार्दन सोनवणे यांच्या कुटुबीयांना देण्यात आला होता. तर जनार्दन सोनवणे यांच्यावर मोरे म्हणून उपचार सुरु होते. या गलथान कारभाराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रभारी किरीट सोमय्या व आमदार निरंजन डावखरे यांनी आज गायकवाड व सोनवणे यांच्या कुटुंबियांसह महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची आज भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेते पत्रकारांशी बोलत होते.

ठाणे महापालिकेची क्रूर चेष्टा

ठाणे महापालिकेने कोरोनाच्या रुग्णांची क्रूर चेष्टा लावली आहे. भालचंद्र गायकवाड यांचा मृतदेह जनार्दन सोनावणे याच्या कुटुंबियांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. काल रात्री भालचंद्र गायकवाड यांच्या कुटुंबियांनी जनार्दन सोनवणे यांची रुग्णालयात भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने पीपीई किट घालून गायकवाड कुटुंबीयांना जनार्दन सोनवणे याच्याजवळ रात्री 11 वाजता नेले. प्रत्यक्षात जनार्दन सोनावणे यांचा 9.40 वाजता मृत्यू झाला होता. जनार्दन सोनवणे यांच्यावर मोरे म्हणून उपचार सुरु होते. तर खुद्द मोरे हे रुग्ण दुसऱ्या मजल्यावर नॉन आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. एकाच नावाने दोन रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा हा धक्कादायक व बेजबाबदार पणाचा कळस असल्याचा आरोप सोमय्या आण निरंजन डावखरे यांनी केला आहे. तसेच मृतदेह आदलाबदली संदर्भात दोन्ही बाजू जबाबदार असल्याचा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सोनावणे कुटुंबियांकडून लिहून घेतलेला बॉण्ड हा क्रूरपणा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विशेष म्हणजे कोरोना रुग्णालयात एवढा भयंकर प्रकार घडूनही ठाणे शहरातील दोन्ही कॅबिनेट मंत्री सत्तेत मश्गुल आहेत. दोन्ही मंत्र्यांनी कुटुंबीयांची भेट घेतलेली नाही. तसेच व्यवस्थापनाशी चर्चाही केली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, असे सोमय्या व डावखरे यांनी सांगितले. यापुढील काळात नातेवाईकांनी मृत व्यक्तीची ओळख पटल्यावरच रुग्णालय प्रशासनाने कार्यवाही करावी, तसेच नातेवाईकांना आणल्याशिवाय अंत्यसंस्कार करु नयेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली असून आयुक्तांनी त्याला मंजुरी दिली आहे.