‘त्या’ एका उत्तराच्या बदल्यात लोक मागेल ते द्यायला तयार होते, शरद केळकरनं सांगितला इंटरेस्टींग किस्सा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी स्टारर बाहुबली हा सिनेमा प्रचंड गाजला. सिनेमा हिंदीत डब करताना मराठी अभिनेता शरद केळकर यानंच प्रभासच्या म्हणजेच बाहुबलीच्या रोलसाठी आवाज दिला होता. सिनेमाच्या पहिल्या पार्टनंतर सगळकीडे एकच प्रश्न विचारला जात होता तो म्हणजे कटप्पानं बाहुबलीला का मारलं. अर्थातच अभिनेता शरद केळकर यालाही याचं उत्तर माहिती होतं. हे उत्तर जाणून घेण्यासाठी अनेकजण त्याच्या मागे पडले होते. इतकंच नाही तर या उत्तराच्या बदल्यात अनेकांनी त्याला महागडे गिफ्ट देण्याचीही तयारी दाखवली होती. काहींनी तर हवं ते घे पण याचं उत्तर दे असंही म्हटलं होतं. खुद्द शरदनंच या संदर्भात चकित करणारा खुलासा केला आहे.

‘काहीही घे पण या प्रश्नाचं उत्तर सांग’

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बोलताना शरद म्हणाला, “बाहुबली सिनेमानंतर एकच चर्चा सुरू होती. कटप्पाने बाहुबली क्यों मारा ? लोकांनी या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी अक्षरश: भंडावून सोडलं होतं. परफ्युम, डिनर अशी किती तरी आमीषे मला दाखवण्यात आली. काहीही घे पण या प्रश्नाचं उत्तर सांग असंही मला काही लोक म्हणाले.”

‘माझ्या पत्नीलाही याचं उत्तर जाणून घ्यायचं होतं, परंतु …’

मुलाखतीत पुढं बोलताना शरद म्हणाला, “माझ्या पत्नीलाही याचं उत्तर जाणून घ्यायचं होतं. परंतु मी तिलाही सांगितलं नाही. परंतु ती खूप अस्वस्थ झाली होती. शेवटी सिनेमा रिलीज होण्याच्या एक आठवडा आधीच मी तिला याचं उत्तर सांगितलं होतं. अर्थातच कुणाला सांगायचे नाही या अटीवर.” असंही त्यानं सांगितलं.