राज्यसभेत मतदानाच्या वेळी सेना का बाहेर पडली ? संजय राऊतांचा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वादळी चर्चेनंतर अखेर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक आज मंजूर झाले. शिवसेनेने सभात्याग केल्याचा फायदा भाजपला झाला. विधेयकाच्या बाजूने 125 तर विरोधात 105 मते पडली. शिवसेनेने मतदानातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला ? याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत म्हणाले, व्होट बँक मजबूत करण्यासाठी हा प्रयत्न आहे. शरणार्थी लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. तामिळ हिंदू सुद्धा श्रीलंकेमध्ये अत्याचार सहन करत आहेत. त्यांच्याबद्दल कोणतीही भूमिका मोदी सरकारने स्पष्ट केलेली नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच बाहेरून शरणार्थी घेत आहात, पण श्रीनगरमधील काश्मिरी पंडिताबद्दल कोणतीही भूमिका मांडत नाही. 370 कलम हटवल्यानंतर काश्मिरी पंडितांना त्यांच्या भूमित अजूनही जाता येत नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

जम्मू काश्मिरमधील पंडीतांबाबत सरकारकडे कोणतेही उत्तर नाही. त्यामुळे आम्ही सभागृहातून बाहेर पडलो. शिवेसेनेच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीवर काही परिणाम होईल का ? असे विचारले असता असा कोणताही परिणाम होणार नाही. आमचा पक्ष हा स्वतंत्र आहे. आमची भूमिका आम्ही ठामपणे मांडली आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Visit : policenama.com