जनता कर्फ्यू’ कशाला ? बारामतीकरांच्या विरोधामुळे अजित पवारांना धक्का

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामतीत जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. मात्र, दादांच्या या निर्णयावर बारामतीकरांनी जनता कर्फ्यूला विरोध दर्शवला आहे.

बारामती नगरपालिका प्रशासनाकडून 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या 14 दिवसांच्या कालावधीसाठी जनता कर्फ्यू लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ’कोरोना रुग्णांची संख्या व परिस्थिती गंभीर असल्यामुळे प्रशासनास हा निर्णय घेणे जरूरीचे आहे. मात्र, व्यापारी आणि प्रातिनिधिक स्वरुपात नागरिकांबरोबर चर्चा होणे गरजेचे होते. कोरोना इतकीच गंभीर परिस्थिती व्यापारी आणि सामान्य नागरिक यांची आर्थिक बाबतीत झालेली आहे’ असे म्हणत बारामती मर्चेन्ट्स असोसिएशनने जनता कर्फ्यूच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. शेतकर्‍यांचे खरीप हंगामाचे पिक बाजारात येत आहे. मुग, बाजरी, मका ही पिके निघालेली असून रोजच पावसाचे सावट असताना ती विकण्यासाठीची व्यवस्था उपलब्ध नसेल तर शेतकर्‍यांची कुचंबना होणार आहे. व्यापारी वर्गाबरोबर प्रशासनाने चर्चा करून मार्ग काढला पाहिजे अशी मागणीही बारामती मर्चेन्ट्स असोसिएशनने केली आहे.