फक्त राज्यातच का ? संपूर्ण देशाचीच निवडणूक घ्या : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे आव्हान दिले होते. त्यावर हिंमत असेल तर निवडणूका घ्या. जनता कोणाच्या बाजूनं आहे ते कळेल, असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रति आव्हान दिले आहे. नुसत्या राज्यातच कशाला ? संपूर्ण देशात निवडणूका घ्या, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

एल्गार परिषद व भीमा कोरेगाव प्रकरणाच्या तपासावरून सध्या राज्यात चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. वेगवेगळ्या विषयांवर प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते. सगळ्याच विषयांवर सर्वांची मतं जुळत नाहीत. मात्र, एकूण परिस्थिती उत्तम असून सरकार व्यवस्थित चाललं असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

हिंमत असेल तर आमचं सरकार पाडून दाखवा, असं खुलं आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिले होते. सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या, असे फडणवीस म्हणाले होते. नवी मुंबईत भाजपच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात त्यांनी हे आव्हान दिले होते.