का तुटली होती बॉलिवूडमधील चर्चित ‘सलीम-जावेद’ची आयकॉनिक जोडी, Salim Khan यांनी स्वतः केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलिवूडमध्ये अश्या अनेक जोड्या आहेत, ज्यांची चर्चा आजही लोकांमध्ये आहे.अशीच एक जोडी म्हणजे सलीम खान आणि जावेद अख्तर, ज्यांनी 70 च्या दशकात एकापेक्षा एक चित्रपट लिहिले. या चित्रपटांमध्ये ‘शोले’ ते ‘जंजीर’ आणि ‘डॉन’ सारख्या बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, एक दिवस सलीम-जावेदची जोडी तुटली होती.

सलीम साहेबांच्या म्हणण्यानुसार, एके दिवशी ते संध्याकाळी काही काम करत होते आणि जावेद अख्तर आले आणि त्यांनी मला सांगितले की मला वेगळे व्हायचे आहे. यावर सलीम साहब यांनी जावेद अख्तर यांना विचारले की, हा विचार पाच मिनिटांपूर्वी तर आला नसेल, यावर जावेद म्हणाले की,मी बऱ्याच काळापासून याबद्दल विचार करत आहे. यानंतर सलीम खान तिथून उठले आणि आपल्या गाडीकडे जाऊ लागले , जावेद अख्तरही मागे-मागे येत होते.

सलीम साहेब म्हणतात, ‘मी जावेदला थांबवलं आणि म्हटलं की मी स्वतःची काळजी घेऊ शकतो. यानंतर मी घरी आलो, आंघोळ केली पण याबद्दल मी कुणालाही सांगितले नाही. सलीम साहेब यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “जावेदला प्रत्यक्षात चित्रपटांमध्ये गाणी लिहायची इच्छा होती, त्यांनी मला असेही सांगितले की, मी तुम्हाला या गोष्टीचे श्रेय देईन पण मी स्पष्टपणे नकार दिला.”

सलीम खान पुढे सांगतात, ‘मी जावेदला सांगितले की, तुम्ही गाणी लिहाल, संगीत दिग्दर्शकाजवळ बसाल तर तिथे बसून मी काय करीन? माझ्या कामावरही याचा परिणाम होईल. म्हणून मी त्यांना नकार दिला, म्हणून त्याने असेही म्हटले की मग मी दुसर्‍या कोणाचे नाव देतो. यानंतर सलीम खान म्हणाले की, तुमच्या कामात आजपासून माझे नाव सोबत येणार नाही आणि अशा प्रकारे ही जोडी कायमची तुटली.